पुणे – महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) ऑनलाइन अर्जासंबंधीत आणि उमेदवारांच्या अडचणी, शंकांचे निवारण करण्यासाठी टोल फ्री क्रमांकामाध्यमातून मदत केंद्र उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे.
“एमपीएससी’तर्फे विविध पदांच्या भरतीसाठी परीक्षा घेतली जाते. या परीक्षांसाठी लाखो संख्येने उमेदवार अर्ज करतात. मात्र, उमेदवारांना अर्ज करताना तांत्रिक अडचणीसह अनेक शंका उपस्थित होतात. त्यावेळी आयोगाचे मुख्य केंद्र असलेल्या मुंबईतून सर्वच उमेदवारांना त्यांचे प्रश्नांचे उत्तर मिळत नाही. त्यावरून आयोगाच्या कार्यपद्धतीविषयी तक्रारी येतात.
यापार्श्वभूमीवर आयोगाने “18001234275′ आणि “18002673889′ या टोल फ्री क्रमांकावर मदत केंद्राची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. हे टोल फ्री क्रमांक सोमवारपासून (दि. 1 मार्च) कार्यान्वित झाले आहे.
सोमवार ते शुक्रवारी सकाळी 9 ते रात्री 8 आणि शनिवार, रविवार या दिवशी सकाळी साडेनऊ ते सायंकाळी साडेसहा वाजता दूरध्वनीवरून शंका निरसन करता येईल. याशिवाय, support-online@mpsc.gov.in या इ-मेल आयडीववर तांत्रिक कारणासाठी संपर्क करू शकता येणार आहे.