मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना जुहूमधील बंगल्याला मुंबई महानगर पालिकेने नोटीस बजावल्यानंतर आज मुंबईत त्यांनी पत्रकार परिषद घेतली. या परिषदेत राणेंनी राज्यातील सत्ताधारी पक्ष असलेल्या शिवसेनेवर परखड टीका केली. तसेच यावेळी आपल्या बंगल्याचे काम पूर्णपणे कायदेशीर आहे, अशी भूमिका राणेंनी मांडली. यावेळी नितेश राणेंनी म्याव म्याव आवाज काढल्याच्या मुद्द्यावर बोलताना नारायण राणेंनी सत्ताधाऱ्यांना खोचक टोला लगावला. तसेच, आपण कारवाईला घाबरत नसल्याचे देखील ते म्हणाले.
नारायण राणेंनी पत्रकार परिषदेत आपल्यावरील आरोपांना उत्तर द्यायला आपण समर्थ असल्याचे म्हटले. “जुहू-वांद्रेच्या इमारती बघा. त्या आधी तपासा. मुंबईत कायदेशीर-बेकायदेशीर काय हे पाहा आणि मग आमच्याकडे या. इथे काही कमी-जास्त असेल तर आम्ही बसलो आहोत ना. त्यासाठी नोटिसा वगैरे लावताय. कोण आहेत हे? चांगल्या आठवणी मिळतायत आणि जबाबदाऱ्या वाढत आहेत. मी उत्तर द्यायला समर्थ आहे”, असे राणे म्हणाले.
विधिमंडळातील ज्या प्रकरणामुळे नितेश राणेंवर कारवाईची मागणी केली गेली आणि अनेक राजकीय आरोप झाले, त्यावर राणेंनी खोचक टोला लगावला. “एक कारवाई म्याव म्यावची आहे. म्याव म्याव कोण आहे हे माहीत नाही. वाघ जाऊन मांजरं कशी आली हे कळलं नाही मला. स्वत:ला वाघ म्हणणारे मांजरीच्या आवाजाने का असे झाले कळलं नाही. नितेश एक कलाकार बनतोय याचं समाधान आहे. मांजरीचा आवाज काढलाय त्यानं. त्याच्यातला कलावंत उमगला”, अशा खोचक शब्दांत नारायण राणेंनी यावेळी निशाणा साधला.