टोकियो – टोकियो पॅरालिम्पिक क्रीडा स्पर्धेचा रविवारी थाटात समारोप झाला. या दिवशीही भारतीय खेळाडूंचे यश अधोरेखित झाले. आयएएस अधिकारी असलेल्या पॅरा बॅडमिंटनपटू सुहास यथिराज यांनी स्पर्धेच्या अखेरच्या दिवशी रजतपदकाला गवसणी घातली.
पुरुष एकेरीत बॅडमिंटन स्पर्धेत सुहासला सुवर्णपदक जिंकण्याची संधी होती. मात्र, अंतिम लढतीत पराभव झाल्यामुळे त्याला रजतपदकावरच समाधान मानावे लागले. सुहास आयएएस अधिकारी असून टोकियो पॅरालिम्पिकमध्ये पदक जिंकणारे पहिले आयएएस अधिकारी ठरले आहेत. अंतिम सामन्यात सुहास यशिराज यांच्यासमोर फ्रान्सच्या अग्रमानांकित ल्युकास मझूरचे आव्हान होते.
भारताची स्पर्धेत ऐतिहासिक 19 पदके
याआधी सुहास याने उपांत्य फेरीत इंडोनेशियाच्या फ्रेडी सेटियावानवर 21-9, 21-15 असा केवळ 31 मिनिटांत विजय मिळवला होता. अंतिम सामन्यात फ्रेडी सेटियावानने सुहासला पराभूत करत सुवर्णपदक जिंकले. दरम्यान, ब्रॉंझपदकाच्या स्पर्धेत भारताच्या तरुण ढिल्लॉंचा पराभव झाल्याने भारताची आणखी एका पदकाची संधी हुकली.
राष्ट्रपती व पंतप्रधानांकडून कौतुक
टोकियो पॅरालिम्पिक स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी मिळवलेल्या 19 पदकांच्या यशावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह क्रीडापटू, सेलिब्रिटी यांनी आनंद व्यक्त केला आहे. देशाची मान तुमच्या कामगिरीने उंचावली असून येत्या काळात देशाला असेच चमकदार यश मिळवून देण्यासाठी शुभेच्छा, आशा शब्दात खेळाडूंचे कौतुक करण्यात आले आहे.
अभूतपूर्व सोहळ्याने समारोप
स्पर्धेचा समारोप स्थानिक कलाकारांच्या अदाकारीने अभूतपूर्व सोहळ्याने करण्यात आला. स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व देशांचे ध्वजधारक व खेळाडू यांचे जल्लोषात अभिनंदन करण्यात आले. भारताची ध्वजधारक व या स्पर्धेत दोन पदके जिंकणारी अवनी लेखरासह संपूर्ण भारतीय पथकाचेही दीमाखदार आगमन झाले तेव्हा टाळ्यांचा प्रचंड कडकडाट करण्यात आला.