टोकियो – टोकियो ऑलिंपिकच्या दुसर्या दिवशी भारतीय खेळाडूने वेटलिफ्टींग प्रकारात ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली. भारताच्या मीराबाई चानू हिने 49 किलो वजन गटात रौप्य पदकावर आपले नाव कोरले. तिने स्नॅचमध्ये 87 किलो अशी उत्तम कामगिरी नोंदवली. तर Jerk मध्ये 115 किलो अशी कामगिरी नोंदवली.
या ऐतिहासिक कामगिरीनंतर मीराबाई चानूची पहिली प्रतिक्रिया आली. तिने ट्विट करत आपल्या भावना व्यक्त केल्या. ट्विटमध्ये तिने वेटलिफ्टिंगमध्ये मिळालेलं मेडल देशाला समर्पित केलं. ‘हे एक स्वप्न होते, जे खरे झाले आहे’, अशी भावना मीराबाईनं व्यक्त केली आहे.
मीराबाईनं कुटुंबीय, प्रशिक्षक आणि फॅन्सचे देखील आभार मानले. ती पुढे म्हणाली, मी हे मेडल देशाला समर्पित करते. माझ्या यशासाठी प्रार्थना करणाऱ्यांचे आभार. माझ्या आईने माझ्यासाठी खूप त्याग केला. माझ्यावर विश्वास दाखवला. तसेच आपले सरकार, क्रीडा मंत्रालय, साई, आयओए, वेटलिफ्टिंग फेडरेशन, रेल्वे, स्पॉनर्स आणि माझ्या मार्केटिंग टीमची देखील मी आभारी असल्याचं मीराबाई चानूने म्हटलं.
I am really happy on winning silver medal in #Tokyo2020 for my country 🇮🇳 pic.twitter.com/gPtdhpA28z
— Saikhom Mirabai Chanu (@mirabai_chanu) July 24, 2021
वेटलिफ्टिंगच्या इतिहासातील भारताला दुसरं ऑलिम्पिक मेडल आहे. यापूर्वी करनाम मल्लेश्वरीनं सिडनी ऑलिम्पिकमध्ये ब्रॉन्झ मेडल जिंकले होते.