टोकियो – जपानमधील करोनाचा धोका आणखी वाढत असतानाच आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे (आयओसी) अध्यक्ष थॉमस बाख यांनी जपानचे पंतप्रधान योशिहिदे सुगा यांच्याशी चर्चा केली. ही स्पर्धा यशस्वीपणे आणि सुरक्षितपणे आयोजित करण्याची शपथ यावेळी दोघांनी घेतली. ही आणाभाका घेण्याची वेळ नसून करोनाचा धोका वेळीच ओळखून स्पर्धेसमोर असलेले संकट कसे दूर करता येइल याकडे लक्ष दिले गेले पाहिजे, असे जपानमधील एका सामाजिक संस्थेने म्हटले आहे.
जपानमध्ये 20 टक्क्यांपेक्षा कमी लोकांचे लसीकरण झाले असल्याने जपानच्या जनतेसाठी ऑलिम्पिकचे सुरक्षित आयोजन करण्यात यावे, अशी सूचना सुगा यांनी बाख यांनी केली आहे. ऑलिम्पिकच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व सहभागी स्पर्धकांनी करोनाबाबतच्या उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यासाठी आयओसीने पुरेपूर प्रयत्न करावेत, अशी अपेक्षाही बाख यांनी व्यक्त केले.
ऑलिम्पिक चळवळीचा भाग म्हणून आम्ही चोखपणे या उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न करू. जेणेकरून जपानी लोकांच्या जीविताला कोणताही धोका उद्भवणार नाही,असे आश्वासन बाख यांनी दिले आहे. ऑलिम्पिक क्रीडाग्राममध्ये राहणाऱ्या 85 टक्के स्पर्धक आणि अधिकाऱ्यांचे लसीकरण झाले आहे. तसेच आयओसीचे सदस्य आणि कर्मचाऱ्यांचे 100 टक्के लसीकरण झाले आहे, असेही बाख यांनी नमूद केले.
करोनाचे संकट कायम असतानाही ऑलिम्पिक रद्द करणे हा पर्याय नव्हता. अनेक वर्षे ऑलिम्पिकची तयारी करणाऱ्या खेळाडूंना केंद्रस्थानी ठेवून टोकियो ऑलिम्पिकच्या आयोजनाचा निर्णय घेण्यात आला, असे बाख यांनी सांगितले.
ही स्पर्धा रद्द झाली असती तर खेळाडूंची एक संपूर्ण पिढी आम्ही गमवाली असती. त्यामुळे ऑलिम्पिक रद्द करण्याचा निर्णय आम्ही घेतला नाही. ही स्पर्धा रद्द करून विम्याद्वारे संपूर्ण स्पर्धेची रक्कम आम्हाला सहजपणे वसूल करता आली असती. पण आयओसीने हा मार्ग निवडला नाही. उलट अधिक गुंतवणूक करून स्पर्धेच्या आयोजनासाठी आम्ही प्रयत्न केले, असेही बाख म्हणाले.
ऑलिम्पिक गीत स्पर्धेपूर्वीच गाजले
भारताचे नवनियुक्त केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनी देशातील ऑलिम्पिकपात्र खेळाडूंसाठीच्या चिअरफॉर इंडिया या ऑलिम्पिक गीताचे अनावरण केले. देशवासीयांनी ऑलिम्पिकपात्र खेळाडूंना भरघोस पाठिंबा द्यावा, असे आवाहनही त्यांनी या वेळी केली. ग्रॅमी पुरस्कार विजेते संगीतकार ए. आर. रहमान आणि युवा गायिका अनन्या बिर्ला यांनी हे गाणे तयार केले आहे. हे गाणे अनावरणानंतर लगेचच रिंगटोनच्याही रुपात प्रसिद्ध झाले तसेच विविध क्रीडापटूंनीही या गाण्याला लाईक्स केले व अनावरणानंतर लगेचच हे गाणे चर्चेतही आले.
जयदीप, सकिनाला पॅरालिम्पिकची लॉटरी
पॉवरलिफ्टर जयदीप कुमार आणि सकिना खातून यांनी आगामी टोकियो पॅरालिम्पिकसाठी पात्रता मिळवली. जागतिक पॅरा पॉवरलिफ्टिंग महासंघाने कोटा पद्धतीतून भारताला दोन जागा मिळाल्या. जयदीपने पुरुषांच्या 65 किलो वजनी गटात तर खातूनने महिलांच्या 50 किलो गटात पात्रता मिळवली. खातून हिने 2014 सालच्या राष्ट्रकुल स्पर्धेत ब्रॉंझ तर, 2018 सालच्या आशियाई पॅरा स्पर्धेत रजतपदक पटकावले आहे. आता याच कामगिरीची पुनरावृत्ती टोकियोत करावी अशी अपेक्षा आहे.