नवी दिल्ली – जागतिक क्रीडा क्षेत्रातील सर्वात मानाची समजली जाणारी ऑलिम्पिक स्पर्धादेखील करोनाच्या धोक्यामुळे पुढे ढकलली गेली असली तरीही या स्पर्धेसाठी आवश्यक असलेल्या पात्रता फेरीच्या स्पर्धा मात्र येत्या काळात निश्चितच घेण्यात येतील असे स्पष्टीकरण भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे (आयओए) अध्यक्ष नरेंद्र बात्रा यांनी दिले आहे.
यंदा 24 जुलै ते 9 ऑगस्ट या कालावधीत होणारे टोकियो ऑलिम्पिक एक वर्षाने पुढे ढकलण्यात आले आहे. ही स्पर्धा पुढील वर्षी होणार असल्याने त्यात पात्र होण्याची आणखी संधी भारतासह जगभरातील खेळाडूंना मिळालेली आहे. त्यामुळे येत्या काळात करोनाचा प्रभाव संपुष्टात आला की काही दिवसांतच पात्रता स्पर्धा भारतात सुरु करण्यात येतील. त्यापूर्वी प्रत्येक राज्यांच्या तसेच राष्ट्रीय स्तरावरील संघटनांना आपल्या पात्रता स्पर्धांची क्रमवारी व यादी तयार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, असेही बात्रा यांनी सांगितले.