पुणे – कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशभरात लॉकडाऊन घोषित केला आहे. त्यामुळे 42 ते 43 दिवस राज्यभरात दारूची दुकानं बंद होती.
दरम्यान, केंद्र आणि राज्य सरकारने दोन दिवसांपासून दारू विक्रीचा निर्णय घेतल्याने मोठ्या प्रमाणावर गर्दी दिसून आली. त्यामुळे अनेक ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं उल्लंघन झाल्याचं चित्र दिसून आले.
मात्र आता वाईन शॉपबाहेरील गर्दी टाळण्यासाठी दुकानदारांनी मद्यप्रेमींना टोकन दिले असून, या टोकनवर वेळ आणि दिनांक असल्याचे दिसून येत आहे.
जिथे गर्दी होईल तिथली दुकानं काही काळासाठी बंद करण्याची कारवाई स्थानिक प्रशासन करत आहे. त्यामुळे नियम पाळले नाहीत तर दारूची दुकानं बंद होतील हे लक्षात घेऊन ग्राहकांनी शिस्त पाळावी असं आवाहन राज्याचे उत्पादन शुल्क आयुक्त कांतीलाल उमप यांनी एका वाहिनीशी बोलताना केलं आहे.