पुणे जिल्हा (वाघळवाडी प्रतिनिधी) – गेल्या काही दिवसापासून वीर धरण परिसरात सतत पाऊस होत आहे. तसेच आज सकाळपासून जोरदार पाऊस पडत आहे. सातारा, पुणे, सोलापूर जिल्ह्यास वरदान असणाऱ्या वीर धरणाच्या कालच्या पाण्याच्या साठ्यात वाढ होऊन 99 टक्के पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे आज सकाळी पुन्हा एकदा 5 दरवाजे 4 फुटांनी उचलून 23 हजार क्यूसेकने पाण्याचा विसर्ग नीरा नदीत करण्यात आला आहे. त्यामुळे नीरा नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
दरम्यान, सोमवारी (दि.29) पाच वाजेपर्यत वीर धरणात सुमारे 98 टक्के पाणीसाठा झाला असल्याची आणि पाणलोट क्षेत्रात एकुण 251 मि.मी. पावस झाल्याची नोंद झाली होती. त्यामुळे सोमवारी (दि. 29) दुपारी 4 वाजता धरणाचे तीन दरवाजे 4 फुटाने उचलून 15 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग नीरा नदीमध्ये करण्यात आला होता.