नागपूर – विविधतेचे भारत कसे व्यवस्थापन करतो याकडे आज साऱ्या जगाचे आपल्यावर लक्ष लागून राहिले आहे, असे सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटले आहे. नागपुरात आज सन 2047 सालातील भारत, माझा दृष्टिकोन माझी कृती या विषयावर आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते.
ते म्हणाले की, जग आज अनेक अंर्तविरोधाने भरलेले आहे; पण या द्वैताचे व्यवस्थापन कसे करायचे हे केवळ भारतच दाखवून देऊ शकतो. या देशातील अनेक ऐतिहासिक घटना आपल्याला योग्य पद्धतीने सांगितल्याच गेल्या नाहीत. उदाहरणार्थ संस्कृत व्याकरण जिथे जन्माला आले ते ठिकाण भारतात नाही, हे असे काय असा प्रश्न आपण कधी विचारला आहे का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. याचे मुख्य कारण आपण आपली माहिती ज्ञान आणि हुशारी हरवून बसलो आहोत. त्यामुळे विदेशी आक्रमकांनी आपल्यावर अतिक्रण केले.
आपण जात आणि अन्य बाबींना अनावश्यक महत्त्व दिले. कामाच्या विभागणीसाठी वेगवगळे लोकसमूह निर्माण केले गेले. त्यातूनच मोठे भेदभाव निर्माण झाले. आपल्या पोषाख, संस्कृती, भाषांमध्ये काही भिन्नता असेल पण असल्या छोट्या बाबींत आपण गुंतून न पडता आपण मोठ्या परिप्रेक्षात विचार केला पाहिजे. भारतातील प्रत्येक भाषा ही राष्ट्रीय भाषा आहे. वेगवेगळ्या जातीतील लोक हे माझे आहेत अशी आपुलकी आमच्यात निर्माण व्हायला हवी अशी अपेक्षाही यावेळी सरसंघचालकांनी व्यक्त केली.