लोकसभा निवडणुकीच्या अंतिम टप्प्यातील मतदानाबाबत उत्सुकता
नवी दिल्ली -भारतीय लोकशाहीचा सर्वांत मोठा सोहळा असणाऱ्या लोकसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया उद्या (रविवार) पूर्णत्वास जाणार आहे. निवडणुकीतील अखेरच्या आणि सातव्या टप्प्यासाठी देशभरातील लोकसभेच्या 59 जागांसाठी मतदान होईल. त्या टप्प्यात रिंगणात असलेल्या 918 उमेदवारांचे भवितव्य 10 कोटींहूून अधिक मतदार ठरवतील. त्यामुळे प्रतिष्ठा पणाला लागलेल्या प्रमुख उमेदवारांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाही समावेश आहे.
अंतिम टप्प्यातील मतदानाबाबत मोठी उत्सुकता आहे. त्या टप्प्यात पंजाबमधील सर्व 13 जागांसाठी मतदान होईल. त्याशिवाय, उत्तरप्रदेश (13 जागा), पश्चिम बंगाल (9 जागा), बिहार आणि मध्य प्रदेश (प्रत्येकी 8 जागा), हिमाचल प्रदेश (4 जागा), झारखंडमध्ये (3 जागा) मतदान होणार आहे. चंडीगढमधील एकमेव जागेसाठीही मतदार त्यांचा हक्क बजावतील. मोदी रिंगणात असल्याने अंतिम टप्प्याचे महत्व वाढले आहे. ते उत्तरप्रदेशच्या वाराणसीमधून पुन्हा निवडणूक लढवत आहेत. अनेक महत्वाच्या उमेदवारांमुळे पंजाबमधील निवडणूकही चुरशीची बनली आहे. त्या राज्यातून बॉलीवूड अभिनेता सनी देओल (भाजप) याच्याबरोबरच शिरोमणी अकाली दलाचे प्रमुख सुखबीरसिंग बादल, कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील जाखड, आपचे प्रदेशाध्यक्ष भगवंत मान तसेच हरसिम्रत कौर बादल आणि हरदीपसिंग पुरी हे केंद्रीय मंत्री रिंगणात आहेत.
अखेरच्या टप्प्यातील बिहारमधील लढतीही लक्षवेधक ठरल्या आहेत. त्या राज्यातील पाटणासाहिब मतदारसंघाबाबत सर्वांधिक उत्सुकता आहे. तिथून ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा पुन्हा निवडणुकीला सामोरे जात आहेत. भाजपमधून बाहेर पडून कॉंग्रेसमध्ये दाखल झालेल्या सिन्हा यांचा मुकाबला केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांच्याशी आहे.
मतदानोत्तर चाचण्यांच्या निष्कर्षांकडे लक्ष
लोकसभा निवडणुकीचा निकाल 23 मे यादिवशी जाहीर होणार आहे. त्यामुळे मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाली तरी निकालासाठी काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे. साहजिकच, सगळ्यांचेच लक्ष मतदानोत्तर चाचण्यांच्या निष्कर्षांकडे असेल. अंतिम टप्प्याचे मतदान संपल्यानंतर लगेचच चाचण्यांचे निष्कर्ष जाहीर करण्याची चढाओढ वृत्तवाहिन्यांमध्ये सुरू होईल. ते निष्कर्ष किंवा अंदाज खरे ठरणार का, ते प्रत्यक्ष निकालाच्या दिवशीच स्पष्ट होईल.