माणूस हा समाजप्रिय प्राणी आहे . त्याला सोबत हवी असते माणसांची, त्यांचं प्रेम हवं असतं. विचारांच्या आदान प्रदानासाठी एक मन जाणणारा, आपला कोणीतरी हवा असतो. या समाजात वावरताना त्याचे अनेक माणसांशी संबंध येतात आणि या सगळ्यातून जन्माला येतात नाती. रोजच्या जगण्यातला एक अविभाज्य भाग.
नाती नाना परींची. एकीकडे आई -वडील, बहीण-भाऊ, पती-पत्नी आणि या नात्यांसह येणारी अनेक अन्य नाती. एकीकडे नोकरी व्यवसाय आणि त्या निमित्ताने जोडली जाणारी अनेक नाती त्यातीलच एक महत्वाचे नाते जे रक्ताचे नसते ते म्हणजे मैत्री.
ह्या सर्व नात्यांसमवेत माणसाचा एक प्रवास कडू, गोड आठवणी जोडत आणि अनुभव घेत घेत चालू असतो. प्रत्येक नात्याचा एक वेगळा पैलू असतो. कोणावर प्रेम, कोणावर राग, कुणी खास, कुणी जवळचे, कुणी काही वेळापुरते असे अनेक बंध जोडले जातात ह्या त्याच्या प्रवासात.
याच समाजाचे कार्य नीट चालावे म्हणून, काही नियम किंवा काही अटी ह्या समाजाने निर्माण केलेल्या असतात. त्या पाळत माणूस या समाजाचा एक अविभाज्य घटक बनत असतो. केवळ त्याला वाटतं म्हणून तो काही गोष्टी, समाजाला मान्य नसतील तर नाही करू शकत.
प्रत्येक नातं जोडल्यानंतर सुरवातीचा काळ फार सुदंर, गोड, आल्हाददायक असतो. एखादं नातं सहवासानं जास्त फुलत जातं, खुलत जातं, पण काही वेळा अतिसहवासामुळे एकमेकांचे स्वभाव उलगडल्यामुळे ‘अति तिथे माती’ किंवा ‘अतिपरिचयात अवज्ञा’ ह्या म्हणीला अनुसरून उलट परिणाम सुद्धा होऊ शकतो. इथे माणसाला नातं तर हवं असतं पण बंधन नको असतं.
प्रेम हवं असतं , पण प्रेमापाठोपाठ येणारे हक्क, अधिकार आणि जबाबदाऱ्या नको असतात. त्याला मोकळं जगायचं असतं, पण सगळ्यांच्यासमवेत राहून. कुटुंब, रूढी-परंपरा सांभाळत सणवार, समारंभ, सोहळे त्याला साजरे करायचे असतात आपल्या माणसांसोबत.
पण आजकाल काय झालंय की, माहिती आणि तंत्रज्ञानामुळे जग जवळ आलंय, पण माणसं दूर जात आहेत. जाणिवाच संपत चालल्या आहेत माणसांमधल्या. व्हाट्सऍप, फेसबुकमार्फत जोडली गेलेली जवळ आलेली माणसं मनं मात्र जोडू शकलेली नाहीत एकमेकांची.
लग्नानंतर एखाद वर्षातच नवरा बायकोचं नातं, व्हाट्सऍपद्वारेच “जेवलास का?’, “ऑफिसला पोहोचलास का?’ “निघालास का?’ इतक्या कमी संवादापर्यंत येऊन पोहोचतं. जे आई-वडील लहानपणापासून जीव की प्राण असतात, तेच मोठे झाल्यावर जेव्हा मुलांच्या भल्यासाठी त्यांच्यावर काही बंधनं घालतात, ती त्यांना जाचक वाटू लागतात आणि पालक नकोसे वाटतात. हल्लीच्या मुलांना कुठल्याही कारणावरून जरा काही टोकले तर काय आत्महत्या वगैरे करतील की काय म्हणून पालक आधीपासूनच घाबरून असतात.
या बदलाचा वेग एवढा आहे की, पालकांच्या विश्वात मुलं रमू शकत नाहीत, कंटाळतात आणि पालकांना तर मुलांचं विश्व सुधरतच नाही. प्रियकर-प्रेयसी, ब्रेक-अप्स, लिव्ह-इन, घटस्फोट, दत्तक पालकत्व याही गोष्टी आता नवीन राहिलेल्या नाहीत. त्यामुळे नात्यांनाही नवे परिमाण आले आहेत. संवाद-सहवास-सोबत आता पूर्वीसारखे राहिले नाहीत.
एकत्र कुटुंब पद्धती जाऊन प्रत्येकाचा वेगळा संसार, घर जसं झालं आणि संक्रमण जसजसे होते गेले तसे जुन्या चाली रीती, परंपरा बदलून खोलवर रुजलेले दृष्टिकोनही बदलत गेले. ह्या नव्या बदलाशी, नव्या युगाशी आपल्याला संयत राहायला हवंय, हा मनामनांचा प्रत्येक नात्याला जोडणारा पूल भक्कम ठेवायला हवाय. जुनं चांगलच होतं, पण म्हणून नवं सगळंच वाईट असं नाही ना? संवेदनशीलता जपत, प्रत्येक नात्याचा पदर हळुवारपाने उलगडत हा प्रवास जर केला तर तो सुखकारकच असणार नक्की.
स्वतःवरचा विश्वास आणि प्रेम, प्रामाणिकपणा जर माणसाने जपला तर प्रत्येक मनाच्या खोल तळाशी जाऊन प्रत्येक माणूस, प्रत्येक नातं जाणता येईल, ओळखता येईल. रोज व्हॉट्सअप किंवा इतर मेसेजेस मधून गुड मॉर्निंग पाठवणारा एखादा माणूस आपल्या प्रत्येक दिवसाची सुरुवात गोड करून देतो, तरीही आपण त्याला नावं ठेवतो, कंटाळतो, पण त्या मागचा त्याचा हेतू नातं जोडण्याशी, मन जोडण्याशी असतो हा लक्षात घेत नाही.
आपण सगळेच आत्ताच “गुड मॉर्निंग’ म्हणून आपल्या आयुष्याची सुरवात करूया का गोड? म्हणजे हे नात्यांचे नवे आयामसुद्धा गोड होतील!
– मानसी चापेकर