नवी दिल्ली: केंद्रातील मोदी-2 सरकारची पहिली वर्षपूर्ती आज आहे. पहिल्या वर्षात सत्तारूढ आघाडीचे नेतृत्व करणाऱ्या भाजपचा वैचारिक अजेंडा पुढे नेण्यात सरकारला लक्षणीय यश आले.
मात्र, करोना संकटामुळे पुढील काळासाठी त्या सरकारसमोर महाकाय आव्हाने उभी केली आहेत.
अनेक वर्षांपासून भाजपच्या जाहीरनाम्यांत कलम 370 हटवणे आणि अयोध्येत राम मंदिराची उभारणी करणे हे मुद्दे अधोरेखित व्हायचे. मोदी सरकारने दुसऱ्या कार्यकाळातील पहिल्याच वर्षात कलम 370 हटवून जम्मू-काश्मीरचा विशेष राज्याचा दर्जा रद्दबातल केला.
त्याशिवाय, सर्वोच्च न्यायालयाने राम मंदिर उभारणीचा मार्ग मोकळा केला. ती घडामोड सत्ताधारी भाजपसाठी मोठ्या जमेची बाजू ठरली. भाजपकडे मोठे बहुमत असल्याने पक्षाचा अजेंडा पुढे नेण्यात सरकारला यश मिळत असल्याचे चित्र आहे. मात्र, करोना फैलावामुळे सरकारचा पुढील प्रवास खडतर ठरणार आहे. त्या संकटामुळे अर्थव्यवस्था अडचणीत आली आहे. त्यामुळे सरकारला सर्व लक्ष अर्थव्यवस्थेला उभारी देण्याकडे केंद्रित करावे लागणार आहे.