-माधव विद्वांस
लेखिका व सामाजिक कार्यकर्त्या सुनीता देशपांडे यांचा आज स्मृतीदिन. साहित्यिक पु. ल. देशपांडे यांच्या त्या पत्नी, ही त्यांची ओळख असली तरी त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू होते. त्यांचा जन्म 3 जुलै 1926 रोजी रत्नागिरी येथे झाला. त्यांचे माहेरचे नाव सुनीता ठाकूर असे होते. त्यांचे वडील सदानंद ठाकूर हे रत्नागिरीतील निष्णात फौजदारी वकील होते. ते मूळचे धामापूरचे.
सुनीताबाईंच्या लिखाणामध्ये धामापूरचे तलावाचे वर्णन आहे. हे ठिकाण आता नौकाविहारासाठी पर्यटनस्थळ म्हणून प्रसिद्ध आहे. “सोयरे सकळ’मध्ये यक्षाचे तळे असे त्यांनी धामापूरच्या तलावाला म्हटले आहे. कॉंग्रेसमध्ये असलेले सुनीताबाईंचे मामा राजा पाटेकर यांनी अण्णासाहेब सहस्रबुद्धे ह्यांच्याशी सुनीताबाईंचा परिचय करून दिला. सुनीताबाई सेवादलात सक्रिय झाल्या होत्या.
सहस्रबुद्धे यांनी वर्ष 1942 साली भूमिगत रेडिओ सुरू करण्याची जबाबदारी सुनीताबाईंवर सोपवली होती, पण ते काम पूर्णत्वास गेले नाही. त्यांच्यावर टाइम बॉम्ब बनविण्याचे काम सोपविण्यात आले होते. त्यांनी मोर्चाचे नेतृत्वही केले होते. त्यावेळी मिलिटरीच्या गाड्यांच्या ताफ्याला सामोऱ्या गेल्या होत्या. सुनीताबाईंनी बंगाली आणि उर्दू भाषांचा अभ्यासही केला होता. शिक्षण पूर्ण झाल्यावर त्या मुंबईला आल्या. जुवळे नावाचे एक शिक्षणप्रेमी दादर भागात ओरिएंट हायस्कूल चालवीत होते. तेथेच सुनीताबाईपण शिक्षिका म्हणून हजर झाल्या.
भाई अर्थात पु. ल. पण शिक्षक म्हणून नोकरी करीत होते. त्यावेळी पुलंच्या वर्गात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे त्यांचे विद्यार्थी होते, तर सुनीताताईंच्या वर्गात श्रीकांत ठाकरे होते. शिक्षक म्हणून काम करत असताना दोघांची ओळख वाढत गेली व त्याचे रूपांतर प्रेमात होऊन त्यांनी लग्न करायचे ठरविले. त्यांची छान मैत्री झाली होती.
पुलंनी पुढाकार घेऊन त्यांना लग्नाबाबत विचारणा केली. त्यांना लग्न हे कृत्रिम बंधन वाटत होते मात्र, पु. ल. देशपांडे यांचा स्वभाव व वैचारिक गोष्टी यामुळे पुलंसारख्या बिजवराशी सुनीताबाईंनी विवाहाला होकार दिला. सुनीताबाईंच्या विवाहाला घरच्यांचा खूप विरोध होता, पण धामापूरची आजी मात्र त्यांच्या मागे खंबीरपणे उभी राहिली. धामापूरच्या आजीचा त्यांना खूप लळा होता तसेच त्यांच्यावर प्रभावही होता.
शाळेला उन्हाळ्याची सुट्टी लागल्यावर सुनीताबाई रत्नागिरी येथे आल्या. घरची परवानगी मिळाल्यावर पुलं रत्नागिरीस आले. गप्पाष्टकामध्ये पुलंनी आपल्या विनोदी स्वभावाने सुनीताबाईंच्या माहेरच्या लोकांना प्रभावित केले. सुनीताबाईंचा विवाह थाटामाटाने करावा अशी त्यांच्या वडिलांची इच्छा होती. मात्र, वधुवरांना नोंदणी पद्धतीने विवाह करायचा होता. त्यामुळे त्यांचा विवाह नोंदणी पद्धतीनेच 12 जून 1946 रोजी संपन्न झाला.
सुनीता देशपांडे यांनी “आहे मनोहर तरी’ या आत्मचरित्रामधून त्यांच्या व पुलंच्या जीवनावर सुरेख प्रकाश टाकला आहे. त्यांचे लेखन लोकाभिमुख होते. “सोयरे सकळ’, “प्रिय जी. ए.’, “समांतर जीवन’, “मण्यांची माळ’, “मनातलं अवकाश’ असे लेखन करून लेखक म्हणून स्वतःची वेगळी ओळख करून दिली. विविध वर्तमानपत्रं, दिवाळी अंकांमधून त्यांनी लेखन केले व ते पुस्तकरूपाने प्रसिद्ध केले.
त्यांनी पुलंबरोबर अनेक नाटकांत काम केले. तसेच “वंदेमातरम्’ या राम गबाले दिग्दर्शित चित्रपटातील त्यांची भूमिका अतिशय गाजली. “नवरा बायको’ या चित्रपटातही त्यांनी काम केले. “राजमाता जिजाबाई’ हा एकपात्री प्रयोगही त्यांनी रंगवला होता. पुलंच्या “सुंदर मी होणार’मधील दीदीराजे ही मध्यवर्ती भूमिका त्यांनी साकारली होती. 7 नोव्हेंबर 2009 रोजी पुणे येथे त्यांचे निधन झाले. अभिवादन.