पारनेर – पंतप्रधान पीकविमा योजनेचे अर्ज भरण्यासाठी शेतकऱ्यांची सध्या धावपळ सुरू आहे. उद्या (दि.24) या योजनेंतर्गत अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. मात्र अद्याप तालुक्यातील अनेक शेतकरी पीकविमा भरण्यापासून वंचित असून, या योजनेला मुदतवाढ मिळावी, अशी मागणी होत आहे.
खरीप हंगामात राज्यात प्रधानमंत्री पीकविमा योजनेचे भरण्याचे काम सध्या सुरू आहे. पीकविमा भरण्याचा उद्या शेवटचा दिवस आहे. अनेक शेतकऱ्यांनी पीकविमा भरलेला नाही. शेतकऱ्यांनी पीकविमा भरण्यास अखेरच्या काही दिवसांमध्ये केंद्रांवर गर्दी केली होती. तसेच विमा भरण्यासाठी असणारे ऑनलाईन सॉफ्टवेअर गेल्या आठवड्यामध्ये चार दिवसांपासून बंद होते. त्यामुळे पीकविमा भरणाऱ्या केंद्रांवर शेतकऱ्यांनी आपले कागदपत्र जमा करून दिले होते.
परंतु अद्याप हे कागदपत्र ऑनलाइन भरण्यात आले नसल्याने व उद्या अखेरची मुदत असल्यामुळे अनेक शेतकरी विमा भरण्यापासून वंचित राहू शकतात. तसेच काही कागदपत्र अपलोड होताना अडचणी येत आहेत. त्यामुळे खरीप हंगामातील पीकविमा योजनेस मुदतवाढ मिळावी, अशी मागणी तालुक्यातील शेतकऱ्यांकडून केली जात आहे. पारनेर तालुका दुष्काळग्रस्त तालुका म्हणून ओळखला जातो. येथील शेती ही पावसावर अवलंबून आहे. पावसाची अनियमितता, पेरणीनंतर पडणाऱ्या पावसामध्ये अनेक दिवसांचा खंड या सर्व कारणांमुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनामध्ये घट होते व त्यांना आर्थिक नुकसान होते यासाठी शेतकऱ्यांना पीक विमा हे महत्त्वाचे संरक्षण आहे