-माधव विद्वांस
माळव्यातील मराठा साम्राज्याच्या आधारस्तंभ पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची आज पुण्यतिथी. मध्यम उंचीच्या, डोईवर कायम पदर, मराठमोळी नऊवारी साडी, असे भारतीय संस्कृतीचे दर्शन घडविणारे त्यांचे व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या कार्याचा घेतलेला आढावा…
अहिल्याबाई होळकर यांचा जन्म नगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील चौंडी या गावात 31 मे 1725 रोजी माणकोजी व सुशीलाबाई शिंदे या दांपत्यापोटी झाला. अतिशय छोट्या आणि सामान्य कुटुंबात जन्मलेल्या अहिल्याबाई यांनी इतिहासात मोठे आदराचे स्थान प्राप्त केले आहे. ज्यावेळी स्त्रियांना शिक्षणास बंदी होती त्यावेळी त्यांच्या पित्याने त्यांना लिहिणे, वाचणे शिकविले. त्यांचा विवाह वयाच्या आठव्या वर्षी सुभेदार मल्हारराव होळकर यांचे चिरंजीव खंडेराव यांच्याबरोबर झाला.
खंडेरावांपासून त्यांना मालेराव हा मुलगा आणि मुक्ताबाई ही कन्या अशी दोन अपत्ये झाली. अहिल्याबाईंना वयाच्या अठ्ठाविसाव्या वर्षी वैधव्याला सामोरे जावे लागले. पती खंडेराव कुंभेरी येथे लढाईत धारातीर्थी पडल्यावर त्यावेळच्या प्रथेप्रमाणे त्या सती जायला निघाल्या. पण सासरे म्हणाले, प्रजाहितासाठी तरी तुम्ही सती जाऊ नये. हे राज्य सांभाळायचे आहे. आपल्या सासऱ्यांच्या इच्छेनुसार अहिल्याबाई होळकर यांनी सती न जाता राज्यकारभारावर आपले लक्ष केंद्रित केले. मल्हारराव ज्यावेळी मोहिमेवर असत, तेव्हा स्वतः अहिल्याबाई राज्याचा बंदोबस्त चोख राखीत असत. मल्हाररावांच्या सल्ल्यानुसार कारभार करीत.
त्या दानशूर, कर्तृत्ववान, धर्मपरायण व कार्यक्षम राज्यकर्ती म्हणून ओळखल्या जात असल्या तरी त्यांची राज्यकारभारावर प्रशासकीय पकड घट्ट होती. त्यांच्या वडिलांनी लहानपणी दिलेल्या शिकवणुकीचा आणि सासरे मल्हारराव यांनी दिलेल्या राजकीय कारभाराच्या तालमीचा त्यांना उपयोग झाला. त्या सामान्य कुटुंबातील असल्यामुळे त्यांना प्रजेच्या अडीअडचणींची जाणीव होती. त्यांचे राहणे अतिशय साधे व सात्विक होते. त्यामुळे त्यांना पुण्यश्लोक अहिल्याबाई असे नाव पडले.
ह्युआंन त्संग आणि संत नामदेव यांच्यानंतर अहिल्याबाईंएवढे भारतभ्रमण कोणीही केले नसावे. भारतभ्रमण करीत तीर्थक्षेत्रांच्या जागी त्यांनी अनेक धर्मशाळा बांधल्या.मुख्यत्वे वाराणसी, अयोध्या, द्वारका, घृष्णेश्वर, अमरकंटक, बद्रीनाथ, श्रीशैल्य, ओंकारेश्वर, भीमाशंकर, भरतपूर, गया, हरिद्वार, कोल्हापूर, पंढरपूर, जेजुरी, कुरुक्षेत्र, नाथद्वारा, ओंकारेश्वर, पुष्कर, चित्रकुट, गंगोत्री, रामेश्वर, जगन्नाथपुरी अशा 90 ठिकाणी देवळांचा जीर्णोद्धार, धर्मशाळांची कामे केली. त्यांनी बंगालमधून कारागीर आणून माहेश्वर येथे वस्त्रोद्योग उभा केला. स्थानिक लोकांना प्रशिक्षण दिले व रोजगार उभा केला आणि आपले प्रजाप्रेम सिद्ध केले तसेच दूरदर्शीपणाही सिद्ध केला. आज माहेश्वरी साडी महिलांची जीव की प्राण आहे.
मल्हारराव होळकरांना इंदूर संस्थानची जहागिरी दिली होती. वर्ष 1766 मध्ये त्यांचे निधन झाले आणि अहिल्याबाईंवर फार मोठी जबाबदारी येऊन पडली. त्यांचा पुत्र मालेराव यांना सुभेदारीची वस्त्रे मिळाली; पण थोड्याच दिवसांत त्यांचे निधन झाले. त्यामुळे सर्व कारभाराची जबाबदारी त्याच्यांवर येऊन पडली. कोणतेही कर्ज ना काढता त्यांनी राज्याची तिजोरी भक्कम केली.अहिल्याबाई आता खऱ्या अर्थाने राज्यकर्ती झाल्या. पुढील अठ्ठावीस वर्षे त्यांनी राज्यकारभाराचा गाडा सैन्याच्या सहकार्याने अतिशय कुशलपणे चालविला. तिजोरीत भर घालीत त्यांनी प्रजाहिताकडे लक्ष दिले.
अहिल्याबाईंच्या आयुष्यातील आणखी एक प्रसंग त्यांच्या सुधारकपणाचा दाखला देणारा व लौकिक वाढविणारा आहे. आपली कन्या मुक्ताबाई हिचे स्वयंवर घोषित करताना त्यांनी जाहीर केले की, जो कोणी चोर, लुटारू, दरोडेखोर यांचा राज्यात बंदोबस्त करील, त्या शूर व्यक्तीशी मुक्ताबाईचा विवाह लावला जाईल. हा अलौकिक विचार जाहीर करून त्या थांबल्या नाहीत, तर त्यांनी तशीच कृती केली. यशवंतराव फणसे या गुणी, शूर तरुणाशी त्यांनी मुलीचा विवाह करून दिला.
अहिल्याबाई होळकर हे नाव मराठ्यांच्या इतिहासात अमर झाले. त्याला त्यांची धर्मपरायण आणि उदारवृत्ती कारणीभूत ठरली. बाई काय राज्य कारभार करणार? ही दरबारी मंडळींची अटकळ त्यांनी सपशेल खोटी ठरविली. त्यांचा जुना दिवाण गंगाधर यशवंत चंद्रचूड ऊर्फ गंगोबा याने राघोबादादांशी अहिल्याबाईंविरुद्ध संधान बांधले आणि इंदूर बळकावण्यासाठी प्रोत्साहित केले.
अहिल्याबाईंना हे कळताच त्या युद्धास तयार असल्याचे त्यांनी राघोबादादास कळविले.राघोबांना ते अडचणीचे झाले. हरलो तर बाईंकडून हरलो आणि जिंकलो तरी बाईंशी युद्ध करण्यात कोणती मोठी मर्दुमकी अशा विवंचनेत शेवटी राघोबांना माघार घ्यावी लागली. त्यांचा उत्तम पाहुणचार अहिल्याबाईंनी इंदुरात केला. अशा रीतीने अहिल्याबाईंच्या मुत्सद्देगिरीच्या लौकिकात आणखीच भर पडली. त्यांचे निधन 13 ऑगस्ट 1795 रोजी झाले.