लेखिका, कवयित्री, नाटककार, अभिनेत्री, गायिका योगिनी जोगळेकर यांचा आज जन्मदिन. त्यांचा जन्म 6 ऑगस्ट 1925 रोजी पुणे येथे झाला. योगिनी जोगळेकर यांना बालपणापासून विविध कलांचे धडे मिळाले होते. बालवयातच वयाच्या आठव्या वर्षी त्यांची काव्य प्रतिभा बहरू लागली. त्यांची पहिली कविता शाळेच्या “बालिका-दर्शन’मध्ये छापून आली. शालेय जीवनात “निशिकांतची नवरी’ या नाटकात त्यांनी भूमिका केली होती. शिक्षण घेत असताना संगीत, लेखन, अभिनय, वक्तृत्व, चित्रकला अशा अनेक विषयात त्यांनी प्राविण्य मिळविले होते.
संस्कृत आणि मराठी घेऊन त्या स. प. महाविद्यालयातून बीए ला पहिल्या आल्या. त्या वेळी त्यांना “यशोदा चिंतामणी’, “कुसुम वाघ’, “विंझे’ ही तीन मानाची पारितोषिके तसेच तंबोरा बक्षीस म्हणून मिळाला. त्यानंतर 1948 ते 1953 या काळात पुण्यातील सरस्वती मंदिरात शिक्षिका म्हणून त्यांनी काम केले. “राष्ट्रसेविका समिती’च्या माध्यमातून त्यांनी अनेक वर्षे सामाजिक कार्यही केले होते. योगिनी यांनी वयाच्या आठव्या वर्षांपासून शंकरबुवा अष्टेकर यांच्याकडे संगीताचे धडे घेतले होते तसेच राम मराठे यांचे शिष्यत्व पत्करले. त्यामुळे गाण्याच्या कार्यक्रमातून आपली गायकी त्यांनी सिद्ध केली आणि पुढे त्या गायिका झाल्या. एचएमव्हीने त्यांच्या ध्वनिमुद्रिका काढल्या. सर्व केंद्रांतून आणि भारताच्या सर्व संगीत मंडळांतून त्या गाऊ लागल्या. योगिनी जोगळेकर यांनी “पहिली मंगळागौर’ या चित्रपटासाठी पार्श्वगायन केले. आकाशवाणीवरील गीतरामायणाच्या प्रथम प्रसारणात विरूप झाली शूर्पणखा, ही दाशरथीची कृति सूड घे त्याचा लंकापति हे गाणे योगिनी जोगळेकर यांनी प्रसंगानुरूप त्वेषाने गायले होते. त्यांचा पहिला कथासंग्रह “झुंजूमुंजू’ आहे.
एका खासगी कथाकथन कार्यक्रमात “शिलांगण’ ही कथा ऐकताना प्रसिद्ध लेखक पु. भा. भावे यांचे डोळे ओलावले. ही कथेला मिळालेली पावतीच होती. “नन्या आइसफ्रुटवाला’ या कथेसाठी आचार्य अत्रे यांनी पण त्यांचे कौतुक केले होते. पंडित भास्करबुवा बखले यांच्या जीवनावर या सम हा आणि राम मराठे यांच्या जीवनावर राम प्रहर या चरित्रांचे लेखन करून गुरूला जणू आदरांजलीच वाहिली होती. त्यांचे लेखन बहुविध असले तरी मुख्यत्वे करून कौटुंबिक नाते-संबंधांतील ताण-तणाव, संघर्ष यांवर आधारित असायचे. बदलत्या आधुनिक जगातील उच्चभ्रू वर्गाच्या सामान्य माणसाच्या बरोबरच्या वर्तणुकीचा त्यांनी आपल्या लेखांतून समाचार घेतला आहे, त्यामुळेच त्यांचे लेखन वाचकांना भावले. 45 कादंबऱ्या, 4 कवितासंग्रह, 4 नाटके, 12 कुमार वाङ्मयाची पुस्तके इत्यादी त्यांची साहित्य संपदा आहे.
मधुर स्वरलहरी, सखे बाई सांगते, हरीची ऐकताच मुरली, हे सागर निलांबरा ही गाणी त्यांनी त्यांच्या “रंगात रंगला श्रीरंग उभा’ नाटकासाठी लिहिली व ती खूप लोकप्रिय झाली होती. या नाटकाच्या रौप्यमहोत्सवी प्रयोगाचे वेळी पुण्याच्या बालगंधर्व रंगमंदिरात उपस्थित असलेले संगीत दिग्दर्शक केशवराव भोळे यांनी त्यांचे कौतुक केले व उद्याची मोठी स्त्री-नाटककार होशील, असे म्हणाले.
किल्ले रायगडाच्या पायथ्याशी त्यांच्या कवितेच्या पुढील दोन सुंदर ओळी संगमरवरात लिहिल्या आहेत. “सूर्याआधी नमस्कार पूर्व दिशेला असावा शिवाआधी दंडवत जिजामातेस असावा.’ या ओळी त्यांचे अजरामर स्मारकच म्हणावे लागेल. 1 नोव्हेंबर 2005 रोजी त्यांचे निधन झाले.