-माधव विद्वांस
हिंदी सिनेमातील चरित्र अभिनेते व चित्रपट निर्माते ओमप्रकाश यांचा आज जन्मदिन. ओमप्रकाश यांचा जन्म 19 डिसेंबर 1919 रोजी सधन शेतकरी कुटुंबात जम्मू येथे झाला. त्यांचे शिक्षण सध्याचे पाकिस्तानातील लाहोर येथे झाले. त्यांचे पूर्ण नाव ओम प्रकाश बक्षी. त्यांचे वडील जम्मू व लाहोर येथील शेकडो एकर जमिनीचे मालक होते.
प्रभा छिब्बर यांच्याशी त्यांचा विवाह झाला होता. ते हुबेहूब नक्कल (मिमिक्री) मध्येही तरबेज होते. लहानपणापासूनच ते रामलीलामध्ये अभिनय करायचे. जम्मू येथील दिवाण मंदिर नाटक समाज यांच्या नाटकात ते कमलाची भूमिका साकारत असत. ते वयाच्या 12 व्या वर्षीच शास्त्रीय संगीतही शिकले होते.
दुसऱ्या महायुद्धावेळी एकदा ते रावळपिंडीहून लाहोरला जात होते. त्यावेळी प्लॅटफॉर्मवर सैनिकांची प्रचंड गर्दी होती. गाडीत प्रवेश मिळणेही शक्य नव्हते. धक्काबुक्की करत ते चुकून पहिल्या दर्जाच्या डब्ब्यात शिरले. पण त्यांनी स्वतः मुके असल्याचा अभिनय करून सहानुभूती मिळवली व प्रवास पूर्ण केला. हा त्यांचा खरा पहिला अभिनय होता.
वर्ष 1937 मध्ये लाहोर रेडिओवर कलाकार म्हणून ते हजर झाले. “फतेह दिन’ या नावाने ते पंजाबी श्रोत्यांमध्ये खूप प्रसिद्ध झाले होते. रेडिओ सिलोनवर पण त्यांनी काम केले. एके दिवशी विवाह समारंभामध्ये ओमप्रकाश लोकांबरोबर हास्यविनोद करीत होते. ही गोष्ट सुप्रसिद्ध चित्रपट निर्माते दलसुख पांचोली यांच्या लक्षात आली. त्यांनी ओमप्रकाशना शोधून काढले आणि त्यांच्या लाहोरच्या कार्यालयात बोलवून घेतले.
पांचोली यांनी “दासी’ या चित्रपटामध्ये अभिनेता म्हणून आमेप्रकाश यांना पहिला ब्रेक दिला. या चित्रपटाने त्यांना चंदेरी दुनियेत ओळख मिळवून दिली. त्यांनी त्यानंतर शरीफ बदमाश या मूकपटातही काम केले तसेच पांचोली यांच्या “धमकी’ आणि “आई बहार’ या चित्रपटांतही भूमिका साकारल्या. ते चित्रपटसृष्टीत स्थिरावले. त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी सुमारे 300 चित्रपटांतून काम केले.
वर्ष 1958 मध्ये “हावडा ब्रिज’ या चित्रपटात ओमप्रकाश यांनी अशोक कुमार आणि मधुबाला यांच्यासमवेत श्यामू टांगेवाल्याची वेगळी भूमिका साकारली होती. त्यांच्यावर चित्रित झालेले “सुनोजी ये कलकत्ता है’ हे गाणे बरेच लोकप्रिय झाले होते. ओमप्रकाश पहिल्यांदा 1966 सालामधील “दस लाख’ या चित्रपटाच्या रोमॅंटिक गाण्यामध्ये काम करताना दिसले होते. या चित्रपटासाठी ओमप्रकाश यांना सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनयाचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. या चित्रपटात ओमप्रकाश यांनी एका मोठ्या कुटुंबातील नाखूश वडिलांची भूमिका साकारली होती.
वर्ष 1966 मध्येच ओमप्रकाश यांनी किशोर कुमार, शशी कपूर आणि महमूद यांच्याबरोबर “पिया जान’ या चित्रपटात काम केले. या चित्रपटामुळे महमूद हिट ठरला, पण एका पुरस्कार सोहळ्यात महमूद यांनी “पिया जान’ चित्रपटासाठी ओमप्रकाश यांना त्यांच्या यशाचे संपूर्ण श्रेय दिले. वर्ष 1982 मध्ये प्रकाश मेहरा दिग्दर्शित आणि प्रदर्शित झालेल्या “नमक हलाल’ चित्रपटात त्यांनी अमिताभ बच्चन यांचे आजोबांची भूमिका साकारून प्रेक्षकांचे खूप मनोरंजन केले. “भाई नं. 1′ हा त्यांचा शेवटचा चित्रपट. 21 फेब्रुवारी 1998 रोजी त्यांचे निधन झाले.