कादंबरीकार, लेखक, पत्रकार, कामगार चळवळकर्ते प्रभाकर नारायण पाध्ये ऊर्फ भाऊ पाध्ये यांचा आज जन्मदिन. त्यांचा जन्म 26 नोव्हेंबर 1926 रोजी मुंबईत झाला. वर्ष 1948 मध्ये त्यांनी मुंबई विद्यापीठातून अर्थशास्त्र या विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर काही काळ दोन वर्षे त्यांनी कामगार चळवळीत कार्यकर्ता म्हणून काम केले. त्यानंतर माध्यमिक शाळेत तीन वर्षे त्यांनी शिक्षकाचे काम केले तसेच वडाळ्यातील स्प्रिंग मिल येथे चार वर्षे व एलआयसीत चार महिने त्यांनी कारकुनी केली.
वर्ष 1956 मध्ये शोशन्ना माझगावकर या कामगार चळवळीतील ज्यू (बेनेइस्रायल) समाजातील कार्यकर्तीशी त्यांनी विवाह केला. विवाहानंतर त्यांनी शोशन्ना हे नाव बदलले नाही तसेच पत्नीला तिचा धर्म पाळण्याचे स्वातंत्र्यही दिले. शोशन्नाशी लग्न करताना त्यांना असे वाटले होते की आपली पत्नी आपल्या लेखन कार्याला हातभार लावेल व त्यांच्या इच्छेप्रमाणे वागेल; पण पत्नीने राजकारणात उडी घेतली. कौटुंबिक समस्येमध्ये दोघांनी एकमेकांना साथ दिली.
काही काळ त्यांनी “हिंद मझदूर’, “नवाकाळ’ (1वर्ष) व “नवशक्ती’ (10 वर्षे) या वृत्तपत्रांमधून पत्रकारिता केली. भाऊ पाध्ये आपल्या मताबद्दल ठाम असत. त्यांची जीवनशैली मुक्त होती. कोण काय म्हणेल याची पर्वा न करता ते प्रतिक्रिया देत असत. त्यांचे विचार समाजवादाकडे झुकणारे होते तसेच समाजातील जातियता व रूढीपरंपरे विरुद्ध होते. त्यामुळे त्यांच्या लेखनात त्याचा प्रभाव दिसून येतो. त्यांचे लेखन वास्तवाला भिडणारे होते.
मराठी साहित्यात लघुकथा लेखन स्थिरावत असतानाच पाध्ये यांचा लेखनास प्रवास सुरू झाला होता. त्यांनी लिहिलेल्या “डोंबाऱ्याचा खेळ’, “करंटा’, “वैतागवाडी’, “बॅरिस्टर अनिरुद्ध धोपेश्वरकर’, “वासूनाका’, “होमसिक ब्रिगेड’ या कादंबऱ्या प्रकाशित झाल्या. त्यातील काही कादंबऱ्या या कादंबऱ्या नव्हेतच अशी टीका समीक्षकांनी केली. त्यावेळी समीक्षकांची दहशत असायची. मात्र त्यांच्या स्वभावात बेफिकीरपणा होता त्यामुळे असल्या टीकेला ते बधले नाहीत.
ते समाजवादी पार्टीत सामील झाले होते; पण राममनोहर लोहिया यांच्या पश्चात त्यांनी या पक्षाचा त्याग केला. त्यांना विनोबा भावेंविषयी खूप आदर होता. भूदान चळवळीत त्यांनी भाग घेतला. भाऊंचे 30 ऑक्टोबर 1996 रोजी निधन झाले.