पत्रमहर्षी वा. रा. कोठारी यांची आज जयंती. संपादक म्हणून नावाजलेल्या या व्यक्तिमत्त्वाचा वाङ्मयीनदृष्ट्या घेतलेला संक्षिप्त आढावा…
वा. रा. कोठारी यांचा जन्म 13 सप्टेंबर, 1892 रोजी सोलापूर जिल्ह्यातील माढे तालुक्यातील बावी या खेडेगावात झाला. त्यांचे शालेय व महाविद्यालयीन शिक्षण पंढरपूर, मुंबई व पुणे येथे झाले. 1912 साली ते बीए झाले. पदवीपरीक्षेत पहिल्या वर्गात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये गुणानुक्रमे त्यांचा क्रमांक तिसरा होता, तर इतिहास व अर्थशास्त्रात विद्यापीठात पहिले आले. त्या काळात विद्यापीठाच्या परीक्षेत उत्तम यश मिळवलेले पदवीधर आयसीएस होण्यासाठी विलायतेची वाट धरत असत. वालचंद कोठारी यांनी ही वाट धरली नाही. सामाजिक कार्य करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. 19 जुलै, 1917 रोजी त्यांनी “जागरूक’ हे साप्ताहिक सुरू केले आणि पत्रसृष्टीत प्रवेश केला. नंतरच्या काळात “डेक्कन रयत’, “राष्ट्रमत’, “प्रभात’ आणि “पूना डेली न्यूज’ ही वृत्तपत्रे त्यांनी चालवली तरी “प्रभात’कार म्हणूनच ते ओळखले गेले.
वा. रा. कोठारी यांच्या अवतीभोवती वावरणाऱ्यांना त्यांचे निर्व्यसनी, नियमित आयुष्य आणि साधी राहणी प्रेरणादायी वाटत असे. कोणत्याही संपादकाचे व्यक्तिमत्त्व लख्ख उमटते ते अग्रलेखातून. अग्रलेखासाठी कोठारींनी कोणताही विषय वर्ज्य मानला नाही. वाचकांशी सहज संवाद साधण्यावर त्यांचा भर असे. त्यामुळे अलंकारिक भाषेचा सोस न बाळगता ते सरळ आशयाला भिडत असत.
कोठारी म्हणजे नियमितपणा, पहाटे उठावे, संपादकीय मजकूर पहाटेच लिहावे, ताज्या वृत्तपत्रांचे वाचन करून अग्रलेख लिहावा, “प्रभात’च्या अंकांच्या जुळणीकडे लक्ष द्यावे, सर्व खरेदी-विक्री आणि पैशाअडक्याचे व्यवहार स्वतःच पाहावे, हे करीत असताना प्रचलित चळवळीतील कार्यक्रमांना उपस्थित राहावे, व्याख्याने द्यावीत, त्यासाठी दौरे काढावेत आणि कितीही उशीर झाला असला, तरी रात्री मुक्कामास घरी यावे हा त्यांचा शिरस्ता. कोठारींची वृत्ती मधुकर असल्याने त्यांनी चांगलचुंगलं आत्मसात केलं. “माझे आरोग्य’ या शीर्षकाखाली त्यांनी काही लेख लिहिले. त्यात ते काय व्यायाम करीत, कोणते पथ्य पाळीत याचा सविस्तर उल्लेख केला आहे. कोठारींना बुद्धिमत्तेची देणगी लाभली होती आणि त्यांची स्मरणशक्ती देखील आश्चर्य वाटावी अशीच होती. कोठारींनी जुन्या आठवणी लिहिल्या आहेत. त्या पुस्तकरूपात आहेत. या जुन्या आठवणींत महिने, तास असा तपशील आहे. तो स्मरणाने लिहिलेला आहे. या जुन्या आठवणी त्यांनी वयाच्या 80 व्या वर्षी लिहिल्या हेही लक्षात घेतले पाहिजे.
वृत्तपत्रसृष्टीत प्रवेश करण्यापूर्वी वा. रा. कोठारींनी पदवीधर झाल्यानंतर 1913 ते 1914 या दोन वर्षांमध्ये चार कादंबऱ्या लिहिल्या आणि प्रकाशित केल्या. त्यापैकी तीन भाषांतरित होत्या व एक स्वतंत्र सामाजिक कादंबरी होती. भाषांतरित कादंबऱ्यांपैकी “गोष्यातील सुंदर स्त्रिया’ आणि “निशाचराचा प्रेमविलास’ म्हणजे “रेनॉल्डस’ या कादंबरीकाराच्या दोन कृतींची भाषांतरे होती, तर “पती-पत्नी प्रेम’ रवींद्रनाथ टागोरांच्या बंगाली कादंबरीचे भाषांतर होते. “इंदिरा’ या स्वतंत्र सामाजिक कादंबरीत कोठारींनी सामाजिक सुधारणांचा पुरस्कार केलेला दिसतो. वा. रा. कोठारींनी 1913 मध्ये सुरस ग्रंथ माला सुरू केली. कोठारींच्या चारही कादंबऱ्या या मालेमार्फेतच प्रसिद्ध झालेल्या आहेत. त्यांच्या वाङ्मयाची दखल घ्यावी अशी दोन पुस्तके म्हणजे एक गीतारहस्यावरील टीका असलेले पुस्तक आणि दुसरे शिवछत्रपतींवरील पुस्तक. लोकमान्य टिळकांनी लिहिलेल्या “गीतारहस्य’ या पुस्तकावर कोठारींनी टीकात्मक लेख लिहिले. पुढे ते पुस्तक रूपात प्रसिद्ध केले. यातून त्यांच्या धार्मिक, आध्यात्मिक अभ्यासाचीही चुणूक दिसून येते. शिवाय संस्कृतविषयाच्या गाढा अभ्यासाचीही प्रचिती येते.
कोठारी हे बुद्धिवादी होते. स्वतंत्र विचाराचे होते. आपल्या बुद्धीला पटेल त्याचा ते आग्रह धरीत. त्याबाबतीत त्यांनी कधी तडजोड केली नाही. साहित्य, इतिहास, कला, काव्य, नाट्य, नृत्य, संगीत, आरोग्य, गीतेवर आधारित भारतीय तत्त्वज्ञान, प्राचीन ग्रीक व रोमन साम्राज्याचा इतिहास, शिवचरित्र असा त्यांचा साहित्यिक प्रपंच म्हणता येईल. वालचंद कोठारींना संगीत नाटक हा प्रकार आवडत असे किंबहुना ते संगीत नाटकाचे प्रेमीच होते. 1911 साली आपण आठवड्यातून दोन नाटके पाहत असू, असे त्यांनी “नाट्यविषयक व इतर लेख’ या पुस्तकात लिहिले आहे. त्यातच त्यांनी आपले संगीताचे ज्ञान जुजबी होते, पण कोणतेही गाणे ऐकले की ते राग झटकन सांगत असत. नाट्यगीते गुणगुणत ते अग्रलेख लिहीत असत. नाट्यप्रयोगावर लिहिण्यापेक्षा नाट्य संगीताबद्दल आणि नटांच्या अभिनयाबद्दल लिहिणे त्यांना आवडत असे. त्यांचे नाट्य आणि संगीतप्रेम आयुष्याच्या उत्तरार्धातही कायम होते. नव्या-जुन्या नाटकांकडे त्यांचे लक्ष असे. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीला भरती आलेली असताना स्वराज्य संस्थापक शिवछत्रपतींचे चरित्र प्रेरणा देणारे ठरेल हे ओळखून कोठारींनी “शिवचरित्र’ लिहून प्रकाशित केले. आयुष्याच्या अखेरीस त्यांनी प्राचीन ग्रीस व रोम संबंधी लिहिलेली लेखमाला तसेच फ्रेंच राज्यक्रांतीसंबंधीची लेखमाला भारतीयांनी त्यापासून बोध घ्यावा या उद्देशानेच लिहिली होती. कोठारींची कायदेविषयक तीन पुस्तकेही आहेत. “लॉ ऑफ कॉन्ट्रॅक्ट’, “लॉ ऑफ इव्हिडन्स’ आणि “लॉ ऑफ ट्रान्स्फर ऑफ प्रॉपर्टी’.
वा. रा. कोठारी यांनी लिहिलेल्या कादंबऱ्यांचा सविस्तर विचार करू. त्यांचे लेखन कादंबरी वाङ्मय आणि ललित साहित्याविषयीचे वाङ्मय अशा दोन टप्प्यात विभागता येते. “गोष्यातील सुंदर स्त्रिया’ ही कादंबरी सुरस ग्रंथमालेचे पहिलेच प्रकाशन. ही कादंबरी “Loves of Harem’ या रेनॉल्डसच्या कादंबरीचे भाषांतर आहे. तुर्क देशातील बादशहाच्या कारकिर्दीत होत असलेल्या एका भयंकर गुन्ह्याचा शोध तिथल्याच सुलतान महंमद ऊर्फ खलिलने कसा लावला, याची कथा या कादंबरीत आहे. “निशाचराचा प्रेमविलास’ ही दुसरी कादंबरी रेनाल्डसच्या “Robert Macaire’ या कादंबरीचे रूपांतर असून यातील पात्रांची आणि स्थळांची नावे आपल्याकडची वापरली आहे. विक्रम हा रात्रीच्या वेळी दरोडेखोरी करतो म्हणून त्याचा “निशाचर’ असा जो उल्लेख शीर्षकात केला आहे तो कथानकाला धरून आहे. “पति-पत्नी प्रेम’ ही रवींद्रनाथ टागोरांच्या “चोखेरवाली’ या बंगाली कादंबरीचे भाषांतर आहे. मात्र ती मूळ बंगालीवरून भाषांतरित केलेली नसून नाथुराम प्रेमी यांच्या “आँख की किरकिरी’ वरून भाषांतरित केलेली आहे. राजलक्ष्मी आपल्या मैत्रिणीच्या मुलीला विनोदिनीला, ती असहाय बालविधवा असते म्हणून आपल्या घरी घेऊन येते. हीच या कादंबरीची नायिका आहे.
ती स्वतःच्या सद्गुणांवर भिस्त ठेवून प्रेमाचा घातक खेळ संपूर्ण कादंबरीभर करताना दाखवली आहे. वरील तीनही कादंबऱ्या अनुवादित. “इंदिरा’ ही सामाजिक कादंबरी मात्र कोठारींनी स्वतंत्रपणे लिहिलेली आहे. बालविवाह निषेध किंवा प्रौढ विवाहाचा पुरस्कार, बालाजरठ विवाह निषेध, स्त्रीशिक्षण, विधवाविवाह इत्यादी स्त्रीसुधारणांचा पुरस्कार या कादंबरीत केला आहे.
वा. रा. कोठारी यांनी आपल्या लेखणीतून गोवामुक्ती आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीतही सक्रिय सहभाग घेतला आणि पाठपुरावा केला. संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील कोठारी हे एक नाव अमर आहे. त्याकाळी महाराष्ट्रातील राजकारणावर “प्रभात’मध्ये त्यांनी सलग अग्रलेख लिहिले. 10 फेब्रुवारी 1974 रोजी त्यांची श्वासरूपी “लेखणी’ थांबली. त्यांची पत्रकारिता आजही पत्रकारांसाठी दिशा देणारी ठरत असल्याने त्यांना “पत्रमहर्षी’ ही उपाधी शोभून दिसते.