भारताचे माजी अर्थमंत्री, श्रेष्ठ अर्थतज्ज्ञ व प्रथम श्रेणीचे प्रशासक “पद्मविभूषण’ चिंतामणराव द्वारकानाथ देशमुख यांची आज जयंती. त्यांचा जन्म 14 जानेवरी 1896 रोजी रायगड जिल्ह्यातील नाते या गावी झाला. त्यांचे वडील वकील होते. त्यांचे प्राथमिक शिक्षण नाते या गावी झाले.
कुशाग्र बुद्धीच्या चिंतामणरावांनी वयाच्या अकराव्या वर्षी पहिले बक्षीस आणि पहिली शिष्यवृत्ती मिळविली तेव्हापासून त्यांनी कधीही पहिला क्रमांक सोडला नाही. वर्ष 1912 मध्ये मुंबई येथे आर्यन एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमिक शाळेतून ते मॅट्रिकच्या परीक्षेमध्ये प्रथम श्रेणीत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले. त्या वर्षापासून ठेवण्यात आलेली जगन्नाथ शंकरशेठ शिष्यवृत्ती मिळविण्याचा पहिला मान त्यांनाच मिळाला. एल्फिन्स्टन महाविद्यालयातून इंटरची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर ते इंग्लंडला गेले व केंब्रिजच्या जीझस महाविद्यालयातून बीए झाले.
भौतिकी विषयाच्या प्राध्यापकांनी दिलेल्या एका प्रतिकूल शेऱ्यामुळे त्यांनी तो विषय सोडून त्याऐवजी वनस्पतिविज्ञान हा विषय घेतला व या विषयातील विद्यापीठाचे बक्षीस मिळविले. आयसीएस परीक्षेत ते पहिले आले. वर्ष 1920 मधे देशमुख इंग्लंडमध्ये असतानाच रोझिना सिल्कॉक्स या ब्रिटिश युवतीशी त्यांचा विवाह झाला. त्यांना प्रिमरोझ नावाची मुलगी झाली. मात्र त्यांच्या पत्नीचे वर्ष 1949 मधे निधन झाले. त्यानंतर त्यांचा दुसरा विवाह वर्ष 1953 मध्ये काकीनाडा येथील बीवीएन रामाराव यांच्या कन्या डॉ. दुर्गाबाई यांच्याशी झाला. त्या सुप्रसिद्ध समाजसेविका व सर्वोच्च न्यायालयाच्या अधिवक्त्या होत्या.
वर्ष 1919-30 या कालावधीत चिंतामणरावांनी पूर्वीच्या सेंट्रल प्रॉव्हिन्सेस (मध्य भारत) व बेरार या प्रांतात उपआयुक्त अशा शासकीय पदासह सुमारे 15 प्रशासकीय पदे भूषविली. चिंतामणरावांनी दुसऱ्या गोलमेज परिषदेस सचिव या पदासह अनेक आंतरराष्ट्रीय परिषदांमधे भारताचे प्रतिनिधी म्हणून आपल्या कामाचा ठसा उमटविला होता.
स्वतंत्र भारताचे अर्थमंत्री झाल्यावर आयुर्विमा उद्योगाचे राष्ट्रीयीकरण ही त्यांची सर्वांत म्हत्त्वपूर्ण कामगिरी होती. वर्ष 1956 मध्ये संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या समर्थनार्थ देशमुखांनी मंत्रिपदाचा सर्वप्रथम राजीनामा दिला. महात्मा गांधींची सुमारे शंभर वचने गांधी सूक्तिमुक्तावली या शीर्षकाने चिंतामणरावांनी संस्कृतमध्ये श्लोकबद्ध केली आहेत. “द कोर्स ऑफ माय लाइफ’ (1974) या शीर्षकाने चिंतामणरावांनी आत्मचरित्र लिहिले आहे.
सी. डी. देशमुख हे मराठी, हिंदी, इंग्रजी, संस्कृत यासह सात ते आठ भाषांमध्ये पारंगत होते. त्यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कारासह, लेस्टर (इंग्लंड), प्रिन्स्टन (अमेरिका), म्हैसूर विद्यापीठांनी एलएलडी ही सन्मान्य पदवी देऊन, तसेच अलाहाबाद, नागपूर, पंजाब व पुणे विद्यापीठांनी डी. लिट. ही पदवी देऊन त्यांचा गौरव केला. चिंतामणरावांना सामाजिक कार्याबरोबर बागकामाचीही आवड होती. प्रसिद्ध कवी आणि नाटककार राम गणेश गडकरी यांनी “आनंद वर्धापन’ नावाची कविता सी. डी. देशमुखांवर लिहिली. पुढे “वाग्वैजयंती’ या संग्रहात ती प्रसिद्धही झाली. 2 ऑक्टोबर 1982 रोजी हैदराबाद येथे त्यांचे निधन झाले.