आबुधाबी – रोहित शर्माचा मुंबई इंडियन्सचा संघ आज दिल्ली कॅपिटल्सशी भिडणार आहे. दोन्ही संघांकडे पॉवर हिटर्स फलंदाज असले तरीही त्यात मुंबईच्या फलंदाजांना रोखण्याचे आव्हान दिल्लीच्या गोलंदाजांसमोर राहणार आहे.
स्पर्धेत आतापर्यंत झालेल्या सर्व संघांच्या सामन्यांत मुंबईच्या फलंदाजांनीच सातत्याने वर्चस्व राखले आहे. त्यांची फलंदाजी यंदाच्या स्पर्धेतील सर्वात भक्कम फलंदाजी समजली जात आहे. खुद्द कर्णधार रोहित शर्मा, कॉन्टन डीकॉक, इशान किशन, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, कॅरोन पोलार्ड असे एकापेक्षा एक पॉवर हिटर्स मुंबईकडे आहेत. त्यांनी आजवर खेळलेल्या सामन्यांत समोरच्या संघाच्या गोलंदाजीचा पालापाचोळा केला आहे. त्यामुळे दिल्लीचे गोलंदाज त्यांना कसे रोखणार हा प्रश्न आहे.
फलंदाजीसह त्यांच्या गोलंदाजीतही वैविध्य आहे. प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह, ट्रेन्ट बोल्ट, जेम्स पॅटिंन्सन, पोलार्ड यांच्यासह फिरकी गोलंदाज राहुल चहर व कृणाल पंड्या यांनीही जबाबदारीने व भेदकतेने गोलंदाजी केली आहे.
दिल्लीची फलंदाजी मुंबईच्या तोडीस तोड असली तरीही त्यात सातत्य नसल्याने मुंबईसाठी ही लढत सोपी ठरेल हीच शक्यता जास्त आहे. त्यांच्या संघातील पृथ्वी शॉ, शिखर धवन, कर्णधार श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, शेमरन हेटमायर यांनी चांगली फलंदाजी केली असली तरीही त्यांचा प्रमुख भार अष्टपैलू मार्कस स्टोनिस यानेच उचलला आहे. त्यानेच अनेक सामन्यांत त्यांचा डावही सावरला आहे व गोलंदाजीत चमक दाखवताना महत्त्वाच्या क्षणी बळीही मिळवले आहेत.
कागिसो रबाडा, रवीचंद्रन अश्विन, हर्षल पटेल व अक्सर पटेल यांनीही सरस कामगिरी सिद्ध केली आहे. मात्र, तरीही अनरिच नोर्जे याची गोलंदाजी त्यांच्या संघासाठी प्रमुख अस्त्र ठरत आहे. त्यानेच संघाच्या विजयांत सातत्याने बहुमोल योगदान दिले आहे.
मुंबईच्या फलंदाजीला रोखण्यात त्याला यश आले तर राजस्थानचा विजय निश्चित होणार आहे. या स्पर्धेत आता जवळपास अर्धा टप्पा पार पडला आहे. त्यामुळे आता यापुढे होत असलेले सामने जिंकून स्पर्धेतील आव्हान कायम ठेवण्यासाठी दोन्ही संघांना विजयाची आवश्यकता आहे.
दोन्ही संघांच्या फलंदाजीची मधली फळी सशक्त असल्याने व हे मैदान आकाराने लहान असल्यामुळे दोन्ही संघांतील पॉवर हिटर्सचा खेळ पाहणे रंजक ठरेल. त्यातही पृथ्वी शॉ, श्रेयस अय्यर व स्टोनिस यांची फलंदाजी आक्रमक राहणार हे उघड असले तरीही त्यांना मुंबईच्या रोहित, किशन, पोलार्ड व पंड्या यांच्या आक्रमकतेचे आव्हान राहणार आहे.
पोलार्ड प्रमुख अस्त्र ठरेल
वेस्ट इंडिजचा सर्वात आक्रमक फलंदाज कॅरोन पोलार्ड याने पहिल्या सामन्यापासूनच या स्पर्धेत आपली कामगिरी सिद्ध केली आहे. केवळ फलंदाजीतच नाही तर गोलंदाजी व क्षेत्ररक्षणातही त्याने कौतुकास्पद कामगिरी केली आहे. मुंबई संघात अष्टपैलू खेळाडूंची संख्या जास्त असली तरीही पोलार्डचीच कामगिरी निर्णायक ठरणार आहे.