नवी दिल्ली/जयपूर – पायलट यांनी पुकारलेल्या बंडानंतर गेहलोत सरकारवर अल्पमताची नामुष्की ओढवण्याची चिन्ह निर्माण झाली होती. मात्र काँग्रेस नेतृत्वाला पायलट यांचे बंड शमवण्यात यश आल्याने मोठा राजस्थानातील राजकीय पेच प्रसंग टळला.
दरम्यान, पायलट यांनी उभारलेल्या बंडाला जवळपास महिना उलटल्यानंतर आज प्रथमच गेहलोत-पायलट यांची भेट होण्याची शक्यता आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, उद्यापासून राजस्थान विधानपरिषदेचे विशेष अधिवेशन बोलावण्यात असून त्यापूर्वी आज काँग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीसाठी सचिन पायलट यांना देखील बोलवण्यात असल्याने पायलट-गेहलोत आज सायंकाळी ५ वाजता ही भेट घडेल असं बोललं जातंय.
तत्पूर्वी, पायलट यांच्या बंडानंतर मुख्यमंत्री गेहलोत यांनी त्यांचा उल्लेख ‘निकम्मा’ असा केला होता. बंड शमल्यानंतर पायलट यांनी माध्यमांशी संवाद साधताना आपल्या विरोधातील विखारी टीकेबाबत दुःख व्यक्त केले होते.
मुख्यमंत्री गेहलोत यांनी देखील आपल्या समर्थक आमदारांना ‘जे झालं ते विसरा आणि क्षमा करा’ असा सल्ला दिला होता. अशातच आज पायलट – गेहलोत यांची भेट होणार आहे.