-योगेश मारणे
शिरूर (न्हावरे प्रतिनिधी) – चौफुला राज्यमार्गावरील शिरूर व दौंड तालुक्याला जोडणारा रांजणगाव सांडस व पारगाव(ता. दौंड) येथील भीमा नदीवरील सुमारे अर्धा किलोमोटरचा पुल नदीला मोठ्या प्रमाणावर आलेल्या पाण्यामुळे वाहतुकीसाठी धोकादायक स्थितीमध्ये असून, नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे नदीवरील पुलावरून वाहतुकीला धोका निर्माण झाला आहे.वाहन चालकांनी पुलावरून सावधतेने वाहने चालवावीत असे आवाहन स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.
मात्र सार्वजनिक पाटबंधारे विभाग व सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडून खबरदारीची कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नसून, या विभागांचा कोणताही अधिकारी या ठिकाणी फिरकलेला नाही.त्यामुळे भीमा नदी खोऱ्यात कालच्या प्रमाणे आजही दिवसभर पाऊस सुरू असून, असाच पाऊस सुरू राहिल्यास कधीही पूल पाण्याखाली जाऊ शकतो. त्यामुळे संबंधित विभागांकडून खबरदारी घेण्यात यावी अशी मागणी परिसरातील नागरीक करत आहेत.
सुमारे दोन वर्षांपूर्वी पुलाच्या स्लॅबचे नूतनीकरण करण्यात आले होते. मात्र पुलाच्या कोणत्याही पिलरचे नूतनीकरण झालेले नाही. त्यामुळेच संभाव्य धोका लक्षात घेता अवजड वाहतूक काही वेळ बंद करावी अशी मागणी होत आहे. शिरूरच्या पूर्व भागात रांजणगाव सांडस,वडगाव रासाई येथील वडगाव-नानगाव पुलही पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे शिरूर च्या पूर्व भागातील आलेगाव पागा, रांजणगाव सांडस, नागरगाव, वडगाव रासाई, मांडवगण फराटा,तांदळी या गावांच्या नदी काठच्या परिसराला धोक्याचा व सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.