नवी दिल्ली – पश्चिम बंगाल राज्यातील शैक्षणिक संस्था 20 सप्टेंबरपर्यंत बंद राहतील. अशी माहिती पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बुधवारी दिली आहे. तत्पूर्वी, सोनिया गांधीं यांनी सात राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची व्हर्च्युल बैठक आयोजीत केली होती. यामध्ये ममता बॅनर्जी म्हणाल्या की, जेईई आणि नीटच्या परीक्षा सप्टेंबरमध्ये घेण्यात येत आहेत. केंद्र सरकारकडे जाण्यासाठी आपल्याकडे आता वेळ राहिलेला नाही. केंद्र सरकार जेईई / नीट परीक्षा स्थगित करण्यासाठी काही करत नसेल तर आपण सर्व राज्य सरकारांनी मिळून सर्वोच्च न्यायालयात जाऊ आणि परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करूया.
परीक्षेसंदर्भात कॅप्टन अमरिंदरसिंग यांनी ममता बॅनर्जी यांच्या मताला सहमती दर्शविली आणि ते म्हणाले की आपण सर्वांनी हा मुद्दा सर्वोच्च न्यायालयासमोर उपस्थित करावा. तर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की परीक्षा घ्यायला हव्यात पण परिस्थितीती सुधारल्यानंतर घ्याव्यात.
This will be my request to all state govts, let us do it together, let us go to Supreme Court & postpone the exam for the time being until and unless the situation allows students to sit for exam (JEE/NEET): West Bengal CM at Sonia Gandhi’s virtual meet with CMs of 7 states. pic.twitter.com/uvBfsg1Eeu
— ANI (@ANI) August 26, 2020
सात राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसमवेत सोनिया गांधींच्या बैठकीत सर्व मुख्यमंत्र्यांनी आपले मत मांडले. इतकेच नव्हे, तर कोरोना साथीच्या आजाराचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारने राज्याला पीएम केअर्स फंडातून निधी वितरित करावा, असेही ममता बॅनर्जी म्हणाल्या.
दरम्यान, काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी बुधवारी राज्य सरकारची जीएसटी, एनईईटी आणि जेईईच्या मुद्द्यावर एक बैठक बोलावली होती. या बैठकीत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जीसह कॉंग्रेस शासित राज्यांचे मुख्यमंत्री सहभागी झाले होते. बैठकीस उपस्थित सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी परीक्षा आयोजित करण्याच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात जाण्याचे मान्य केले.
या बैठकीस राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत, छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल, पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग, पुडुचेरीचे मुख्यमंत्री नारायणसामी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी उपस्थित होते.
दरम्यान, जेईई मेन आणि नीट परीक्षा परीक्षेसाठी अजून काही दिवस शिल्लक आहेत. अशा परिस्थितीत पुन्हा एकदा परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी जोर धरू लागली आहे. जेईई मेन परीक्षा 1 सप्टेंबर ते 6 सप्टेंबर दरम्यान होणार आहे, तर नीट परीक्षा 13 सप्टेंबरला होणार आहे. एनटीएने जेईई मुख्य परीक्षेसाठी प्रवेश पत्रे देखील जारी केली आहेत.