नवी दिल्ली – अंतराळात भारताने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. भारतीय अवकाश संशोधन संस्था (इस्रो)ने केलेल्या नियोजनानुसार चांद्रयान 2 चं आज प्रक्षेपण करण्यात आलं. श्रीहरीकोटा इथल्या सतिश धवण अंतराळ केंद्रातून दुपारी 2 वाजून 43 मिनिटांनी चांद्रयान-2 अवकाशात यशस्वीपणे झेपावलं.
#WATCH: GSLVMkIII-M1 lifts-off from Sriharikota carrying #Chandrayaan2 #ISRO pic.twitter.com/X4ne8W0I3R
— ANI (@ANI) July 22, 2019
भारताची ही दुसरी चंद्रमोहीम असून याआधी भारताने 2008 मध्ये चंद्रयान-1 चं प्रक्षेपण केलं होतं. त्यानंतर आज GSLV मार्क III-M1 या प्रक्षेपकाच्या मदतीनं चांद्रयान 2ने उड्डाण केलं. GSLV मार्क III-M1 हे भारताचं सर्वात मोठं प्रक्षेपक यान आहे.
आजच्या यशस्वी उड्डाणानंतर चांद्रयान-2 काही दिवस पृथ्वीच्या कक्षेत भ्रमण करणास असून, त्यानंतर ते चंद्राच्या दिशेने रवाना होईल. तसेच 6 सप्टेंबर रोजी चांद्रयान चंद्रावर उतरेल.
दरम्यान, याआधी 15 जुलै रोजी मध्य रात्री चांद्रयान-2 चे प्रक्षेपण होणार होते. पण ऐनवेळी तांत्रिक बिघाड लक्षात आल्याने ही मोहिम स्थगित करण्यात आली होती. श्रीहरीकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटरमधून जीएसएलव्ही मार्क 3 च्या मदतीने चांद्रयान-2 अवकाशात झेपवणार होते. पण प्रक्षेपण होण्याच्या 56 मिनिटे आणि 24 सेकंद आधी मोहीम थांबवण्यात आली. जीएसएलव्ही मार्क 3 मध्ये इंधन भरत असताना तांत्रिक चूक आढळली आणि हा निर्णय घेण्यात आला.