राहुरी (प्रतिनिधी) – दक्षिण जिल्ह्याची जीवनदायिनी असलेले मुळा धरण 96.42 टक्के भरले आहे. धरणात सध्या 4 हजार 24 क्यूसेकने नवीन पाण्याची आवक सुरू असून, आज अखेर धरणाचा पाणीसाठा 25 हजार 71 दशलक्ष घनफूट झाला आहे. त्यामुळे 1 सप्टेंबर रोजी धरणाचे दरवाजे उघडून मुळा नदीपात्रात पाणी सोडले जाईल, अशी माहिती मुळा पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता सायली पाटील यांनी दिली.
तांत्रिकदृष्ट्या मुळा धरण भरले आहे. मुळा धरणातून पाणी सोडण्यासंदर्भात चाचणी काल यशस्वी झाली आहे. तद्नंतर 1 सप्टेंबर रोजी पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गणेश विसर्जनाच्या दिवशी पाणी सोडण्यात येणार आहे. मुळा धरणाचे पाणी कधी सुटणार, याकडे लक्ष लागले होते. आज रविवारी सायंकाळी मुळा धरणाकडे 4024 क्यूसेक्सने पाण्याची आवक सुरू होती.
मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रावर ढगाळ वातावरण होते. काही ठिकाणी तुरळक स्वरूपात पाऊस पडला. लाभ क्षेत्रावरही ढगाळ वातावरण होते. मात्र, पावसाने लाभ क्षेत्रात विश्रांती घेतली आहे. मुळा नदीत पाणी सोडण्याबाबत तहसीलदार व जिल्हाधिकाऱ्यां कळवण्यात येणार आहे. त्यानंतर मुळा नदीपात्रात पाणी सोडण्यात येणार आहे. तसेच धरणातून पाणी सोडण्याबाबत सावधानतेचा इशारा मुळा पाटबंधारेने दिला आहे. याबाबत पाटील म्हणाल्या, उद्या (दि.31) धरण 98 टक्के भरणार आहे.
येत्या 15 ऑक्टोबरपर्यंत धरणसाठा 25 हजार 500 दशलक्ष घनफूट स्थिर ठेवून, धरणात येणारे नवीन पाणी धरणाच्या दरवाजांतून नदीपात्रात सोडले जाणार आहे. उद्या दुपारी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पाऊस, नवीन पाण्याची होणारी आवक व वाढणारा धरणसाठा, याचा आढावा घेतला जाईल. धरणाच्या पाणलोटात उद्या पाऊस झाला, तर मंगळवारी (दि. 1) सकाळी मुळा नदीपात्रात विसर्ग सुरू केला जाईल.