जगातील सर्वात मोठा लोकशाही देश म्हणून गौरव होत असलेल्या भारताचा 75वा स्वातंत्र्यदिन आज 15 ऑगस्ट 2022 रोजी केवळ भारतातच नाही तर जगात सर्वत्र आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला जात आहे. कोणत्याही सार्वभौम आणि स्वायत्त देशाच्या इतिहासामध्ये स्वातंत्र्याची पंचाहत्तरी निश्चितच आनंदाने साजरी करण्याची गोष्ट असते.
केंद्र सरकारने देशाचा अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर नियोजन केले आहे आणि ते यशस्वी होताना दिसत असल्याने ती निश्चितच अभिनंदनाची बाब आहे. सर्व राजकीय पक्षांनीही आपले सर्व राजकीय अभिनिवेश आणि वाद-विवाद बाजूला ठेवून देशाचा अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिन साजरा करण्यासाठी पुढाकार घेतला आहे, हीच भारतीय लोकशाहीची खासियत मानावी लागते. जेव्हा एखाद्या देशाचा जन्म होतो तेव्हा काही वर्षे तो देश घडवण्यात आणि सावरण्यातच निघून जातात. सर्वसाधारण माणूस वयाच्या पंचाहत्तरीत म्हातारा होत असेल तर एखादा देश मात्र 75व्या वर्षामध्ये तारुण्याला सुरुवात करत असतो. याच विचारातून आता भारतालाही गेल्या 75 वर्षांत काय घडले याचे सिंहावलोकन करून त्याच आधारे आगामी कालावधीमध्ये भारताची दिशा काय ठेवायची, याचा विचार करावा लागणार आहे.
पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी केलेली भारताची समाजवादी आणि कल्याणकारी रचना असो किंवा त्यानंतरच्या कालावधीमध्ये पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी भारताचे कणखर राजव्यवस्थामध्ये केलेले रूपांतर असो किंवा पंतप्रधान राजीव गांधी यांनी देशाला एकविसाव्या शतकात नेण्याचे दाखवलेले स्वप्न असो किंवा नरसिंह राव आणि मनमोहन सिंग यांनी केलेल्या नव्या आर्थिक धोरणाचे यशस्वी नियोजन असो या सर्वच पंतप्रधानांचे भारत घडवण्यामध्ये मोठ्या प्रमाणावर योगदान होते, हे सर्वांनाच मान्य आहे. आधुनिक काळात सोशल मीडियाच्या अतिरिक्त वापरामुळे साध्या साध्या गोष्टींचा अपप्रचार होऊन त्याचे कधी दंगलीत रूपांतर होते सांगता येत नाही. सध्याच्या सरकारचा घटनेवर विश्वास नाही, त्यांना हुकूमशाही आणायची, अशा प्रकारचा जो प्रचार केला जात आहे त्याला योग्य प्रकारचे उत्तर अद्यापही दिले जात नाही, हे दुर्दैवी आहे. त्यामुळे हा प्रचार खरा वाटत आहे. खरेतर भारतीय संविधानात बदल करणे अतिशय अवघड गोष्ट आहे याची जाणीव सर्वांनाच आहे; पण सत्तेवर असलेल्या भाजपच्या नुपूर शर्मासारख्या प्रवक्त्या जेव्हा चुकीची विधाने करून देशाला अडचणीत आणतात तेव्हा पाकिस्तानसारखे देश त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करून वातावरण तापवायचा प्रयत्न करतात.
भारतातील 20 कोटी पेक्षा जास्त मुस्लीम लोकसंख्या जेवढी भारतात सुरक्षित आहे तेवढी इतर कोणत्याही मुस्लीम देशांमध्येसुद्धा सुरक्षित नाही, हे वास्तव आहे. पण एखाद-दुसऱ्या घटनेमुळे विनाकारणच काही संघटना पाकिस्तानसारख्या देशांच्या हातात कोलीत देतात, ही गोष्टही नाकारून चालणार नाही. आगामी कालावधीमध्ये अशा प्रकारच्या घटना घडणार नाहीत याची काळजी सरकारला घ्यावीच लागणार आहे. नरेंद्र मोदी यांनी सत्तेवर आल्यावर “सबका साथ सबका विकास’ ही घोषणा दिली होती, ती प्रत्यक्षात आणण्याची आता हीच वेळ आहे. भारत जेव्हा स्वतंत्र झाला त्याच काळात स्वतंत्र झालेले श्रीलंका किंवा पाकिस्तान यांसारख्या देशांची सध्याची अवस्था बघता भारताची अवस्था खूपच चांगली आहे हे तथ्यही मान्य करायला हरकत नाही; पण दुसरीकडे भारत स्वतंत्र होत असतानाच दुसऱ्या महायुद्धात बेचिराख झालेल्या जपानसारखा देश आज मात्र एवढ्याच कालावधीमध्ये प्रगतीच्या खूप मोठ्या टप्प्यावर पोहोचला आहे, ही गोष्टही नाकारून चालणार नाही. 75 वर्षांत काय काय झाले याची जंत्री मांडत असतानाच जे काही झाले नाही ते पूर्ण करण्याची गरज आता लक्षात घ्यायला हवी.
मोदी सरकारने अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त “हर घर तिरंगा’ योजना राबवण्याची घोषणा केली होती तेव्हा जी व्यंगचित्रं प्रसिद्ध झाली होती त्यामधील एका व्यंगचित्रांमध्ये एका माणसाला घरावर तिरंगा फडकवण्याची इच्छा होती; पण त्याच्याकडे घरच नव्हते, असे विधान प्रसिद्ध झाले आहे. अद्यापही कोट्यवधी लोकांना स्वतःचे घर नाही, हे लोक रस्त्यावर राहतात असे नाही; पण ते स्वतःच्या घरात राहात नाहीत. अनेक लोक झोपडपट्टीत राहात आहेत, हेसुद्धा वास्तव आहे. भारतासारख्या मोठ्या देशामध्ये लोकसंख्या प्रचंड असल्यामुळे विविध प्रश्न निर्माण होतात. त्या प्रश्नावर अद्यापपर्यंत तोडगा काढण्यात आलेला नाही. लोकसंख्येमुळे गरिबी वाढत आहे. गरिबीमुळे झोपडपट्टीसारखे विषय वाढत आहेत आणि आर्थिक विषमताही वाढत आहे. देशात मोठ्या प्रमाणात वाढत असलेली विमानतळांची संख्या असो किंवा दररोज हजारो किलोमीटर बांधले जाणारे महामार्ग असोत किंवा मेट्रोसारख्या वेगवान रेल्वे असोत किंवा महानगरात उभे राहिले जाणारे मोठे मॉल हे प्रगतीचे निकष मानायचे की, आज या महाकाय इमारतींच्या आश्रयाने उभ्या राहिलेल्या झोपडपट्ट्या असोत किंवा अद्यापही ग्रामीण भागांमध्ये शिक्षणाची गंगा न पोहोचल्याचे वास्तव असो, या सर्वांचाच विचार आता करावा लागणार आहे.
सध्या भारताचे जगातील वर्चस्व वाढले आहे आणि आर्थिक ताकदही वाढली आहे; पण त्याचा पाया पूर्वीच्या सरकारांच्या धोरणामुळेच भक्कम झाला आहे, त्याची स्वीकृती आता विद्यमान सत्ताधाऱ्यांना घ्यावी लागणार आहे. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी सोहळ्याची प्रक्रिया पूर्ण झाली की पुन्हा एकदा नव्याने कामाला लागावे लागणार आहे. रौप्यमहोत्सव, सुवर्ण महोत्सव किंवा अमृत महोत्सव हे सर्व प्रवासातील मैलाचे दगड असतात. त्या दगडावर थांबून आपण आतापर्यंत किती अंतर पार केले आहे त्याचा आढावा घेऊन अजून आपल्याला किती पुढे जायचे आहे याचा विचार करावा लागेल.
विद्यमान सत्ताधाऱ्यांनी आता या 75व्या मैलाच्या दगडापाशी थांबून अजून किती काम बाकी आहे त्याचा आढावा घेऊनच आगामी वाटचाल करावी. देशात विश्वासाचे, सौहार्दाचे वातावरण तयार होऊन लोकांचा भारतीय लोकशाहीवरचा आणि भारतीय संविधानावरील विश्वास बळकट होईल यासाठी विशेष प्रयत्न करण्याचे आव्हान आगामी कालावधीमध्ये सत्ताधाऱ्यांना स्वीकारावे लागणार आहे. एकशे चाळीस कोटींपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या भारतामध्ये प्रत्येकाच्या मनात तिरंगा वसत आहे. आपल्या घरावर तिरंगा फडकवणाऱ्या प्रत्येक देशप्रेमी भारतीयाला या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्याच्या शुभेच्छा.