जगण्याचा संघर्ष सामान्य माणसाला जन्मतः पूजलेला असतो. त्याला देश, देव, धर्म, स्मारके आणि प्रतिकांचे काहीही देणं घेणं नसतं. तो आपला माणुसकी धर्म निभावत, आपल्या परीने देशासाठी जमेल तो खारीचा वाटा कोणतीही वाच्यता न करता उचलत असतो. मात्र, त्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून लढणाऱ्या लोकांनी सामाजिक वातावरण पूर्णपणे गढूळ केलेलं आहे. प्रतिकांमध्ये लोकांना गुंतविले की आपला राजकीय स्वार्थ साधणे सोपे जाते. यासाठी एक विशिष्ट यंत्रणा कार्यरत असते. हे केवळ सामान्य नागरिकांच्या मदतीने बंद होऊ शकते, मात्र तूर्तास तरी यात काही बदल होईल असे वाटत नाही. कारण यामध्ये सहभागी होण्यासाठी सामान्य नागरिक स्वत:ला धन्य समजत आहे.
सोनाराने कान टोचावेत असं म्हणतात ते अगदी बरोबर आहे. काही दिवसांपूर्वी प्रकाश आंबेडकर यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचा निधी वाडिया रुग्णालयाला द्या, असे सूचक विधान केलं होत. हे केवळ प्रकाशजी बोलू शकले. हे इतर कोणी बोलले असते तर त्याचे राज्यात फिरणे मुश्कील झाले असते. असो, मोठमोठाली पुतळे उभे करून काय साध्य होत? हे काही कळत नाही. महापुरुषांच्या विचारांचा जागर होणे आवश्यक असताना आपण त्यांच्या स्मारकात गुंतून पडत असू तर आपला भविष्यकाळ काय असेल, हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. लोकभावनेचा विचार केल्यास महापुरुषांची स्मारके निर्माण करणे आवश्यक आहे. मात्र, ही स्मारके निर्माण करीत असताना त्या विशिष्ट महापुरुषाचा आदर नसतो तर त्यात राजकीय स्वार्थ असतो. सरकार बदलले की आपल्या देशात इतिहास बदलतो ही आपल्या शैक्षणिक धोरणांची शोकांतिका आहे. बुद्धांचा मूर्ती पूजेला विरोध होता, मात्र आज जगामध्ये सर्वाधिक मूर्ती या त्यांच्याच आहेत.
महापुरुषांच्या विचारांवर चालायचे सोडून त्याच्या पूर्णपणे विरोधात भूमिका घेऊन त्यांचे दररोज विटंबन करीत असतो. अभ्यासिका, ग्रंथालये, दवाखाने, संशोधन केंद्रे अशा बाबींचा नक्कीच स्मारके आणि पुतळ्यांपेक्षा सर्वांना अधिक फायदा होईल. ज्यातून माणसाच्या प्रगतीला आणि विकासाला चालना मिळेल. समकालीन स्थितीमध्ये प्रकाश आंबेडकर यांनी जी स्पष्ट भूमिका घेतली आहे तशी भूमिका जर सर्व नेत्यांनी घेतली तर नक्कीच आपण महापुरुषांच्या विचारांचे वारस म्हणून घेण्यास पात्र ठरू!
-श्रीकांत येरूळे