हिंजवडी – करोना संकट व नैसर्गिक आपत्तीमुळे जगातील कारखानदारी मेटाकुटीला आली आहे. साखरेचे सर्वाधिक उत्पादन घेणाऱ्या ब्राझील व थायलंड सारख्या देशांमध्ये साखर उत्पादन घटले आहे. त्यामुळे साखरेला चांगली मागणी व दर वाढले आहेत. जागतिक बाजारपेठेत टिकायचे असेल तर सहकारी साखर कारखान्यांनी केवळ साखर उत्पादन करून चालणार नाही तर इथेनॉलसह वीजनिर्मिती, सौंदर्य प्रसाधने व स्टील निर्मिती यांसारखे पूरक उद्योग तातडीने उभारले पाहिजेत, असे प्रतिपादन राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी कासारसाई येथे बोलताना केले.
मुळशी, मावळ, खेड, हवेली, शिरूर या पाच तालुक्यांचे कार्यक्षेत्र असलेल्या श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याच्या 24 व्या गळीत हंगामाचा शुभारंभ वळसे पाटील यांच्या हस्ते गव्हाणीत मोळी टाकून करण्यात आला. या वेळी झालेल्या शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. माजी मंत्री खासदार गिरीश बापट कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
या वेळी मावळ लोकसभेचे खासदार श्रीरंग बारणे, कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष नानासाहेब नवले, आमदार सुनील शेळके, माजी मंत्री मदन बाफना, माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष रमेश थोरात, माजी आमदार कृष्णराव भेगडे, दिगंबर भेगडे, ज्ञानेश्वर लांडगे, शरद ढमाले, कारखान्याचे उपाध्यक्ष बाप्पू भेगडे, आत्माराम कलाटे, रामचंद्र ठोंबरे, माऊली दाभाडे, सविता दगडे, महादेव कोंढरे, गंगाराम मातेरे, दादाराम मांडेकर, किशोर निंबाळकर, साहेबराव पठारे, एन. पी. दुर्वे यांच्यासह संचालक मंडळ व ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते.
कारखान्याचे अध्यक्ष नवले यांनी प्रास्ताविक केले. या कारखान्याचे 22 हजारांहून अधिक सभासद आहेत. 8 हजार हेक्टर ऊस लागवड झाली असून यावर्षी देखील 7 हजार हेक्टर गाळप अपेक्षित आहे. तसेच सर्व सभासदांना 18 ऑक्टोबरपासून दिवाळीला साखर वाटप करणार असल्याचे सांगत कारखाना परिसरात मुळशी आणि मावळच्या सेंटरवर स्वतंत्र पोलीस ठाण्याची मागणी त्यांनी गृहमंत्र्याकडे केली आहे.
या वेळी पुढे बोलताना वळसे पाटील म्हणाले, गेल्यावर्षी कोविडच्या काळात देखील या कारखान्याचा हंगाम यशस्वीपणे पार पाडला. या डोंगरी भागात कारखाना चालविणे तेवढे सहज शक्य नव्हते. परंतु नानासाहेब नवले यांच्या नेतृत्वाखाली अत्यंत अडीअडचणीच्या काळातून कारखाना यशस्वीपणे चालवला जात आहे. पवार साहेबांमुळे महाराष्ट्रात सहकार क्षेत्राला मोठी चालना मिळाली. ब्राझील आणि थायलंडमध्ये साखरेचे प्रमाण कमी झाल्यामुळे आपल्या साखरेला जागतिक पातळीवर मागणी वाढत आहे. महागाई वाढत असल्यामुळे संत तुकारामने देखील 92 कोटींचा इथेनॉल प्रकल्प तातडीने उभा केला पाहिजे. त्यासाठी मदत करायला सरकार तयार आहे. या भागाच्या ट्राफिक पोलीस चौकी आदी प्रश्न सोडविण्याचे काम सरकार आणि आपण सर्वजण मिळून करू. यासाठी मला केव्हाही हक्काने फोन करा.
खासदार श्रीरंग बारणे यांनी या वेळी मनोगत व्यक्त केले. उपस्थितांचे आभार संचालक अनिल लोखंडे यांनी मानले.
बॅंका, संस्था बदनाम करण्याचा भाजपचा डाव
सध्या बॅंक, कारखाने आणि विशिष्ट संस्थांना बदनाम करून स्वतःची राजकीय पोळी भाजण्याचे काम एक महाशय मुंबईहून येऊन करत असल्याचा टोला त्यांनी भाजपचे किरीट सोमय्या यांचे नाव न घेता लगावला. ते म्हणाले, शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याजदराने कर्ज देण्याचा निर्णय पीडीसीसी बॅंकेने अजित पवारांच्या नेतृत्वाखाली घेतला. पण एक एका संस्थेला व कारखान्यांना बदनाम करण्याचा कट काही महाशय करतात.
शेतकरी केंद्रबिंदू मानून कारखान्याचे कामकाज
शेतकरी हा केंद्रबिंदू मानून काम करणारा एक आदर्श कारखाना म्हणून श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे देशभरात नाव आहे. याचे सर्व श्रेय नानासाहेब नवले आणि संचालक मंडळाला जाते. सरकार कुणाचे ही असले तरी नाना सर्वांना एकत्र घेऊन जात असल्याने शेतकऱ्यांच्या हितासाठी यापुढेही त्यांनी काम करावे. नानांचा शब्द कुठलाही राजकीय नेता डावलू शकत नसल्याने हा कारखाना सुरळीत चालू आहे, अशी भावना खासदार गिरीश बापट यांनी व्यक्त केली.
कासारसाई ः श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याच्या 24 व्या गळीत हंगामाचा शुभारंभ गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते मोळी टाकून करण्यात आला.