कर्जत/ जामखेड –1972 पासून शासनातर्फे बांधण्यात आलेल्या विविध जलसाठ्यांची दुरुस्ती करणे आवश्यक असल्याचे निदर्शनास आल्याने राज्यातील जलसाठ्यांची दुरुस्ती करण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने मुख्यमंत्री जलसंवर्धन योजना हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला होता.
दरम्यान, कर्जत जामखेड तालुक्यातील अनेक जलसाठ्यांमधून पाण्याची गळती होऊन मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय होत असल्याने हा अपव्यय थांबवण्यासाठी व जलसाठ्यांना पुनर्स्थापित करण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्री जलसंवर्धन योजना आमदार रोहित पवार यांच्या पाठपुराव्यानंतर मृदा व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या सहकार्याने कर्जत जामखेड तालुक्यात राबविण्यात येणार आहे.
पावसाळा संपला की सर्व बंधारे आटून जातात असं कर्जत जामखेड मतदारसंघातील गावकऱ्यांचं म्हणणं लक्षात घेऊन आमदार रोहित पवार यांनी ग्रामस्थांशी चर्चा करून कर्जत जामखेड तालुक्यातील सर्व बंधाऱ्यांचं सर्वेक्षण करून घेतलं त्यामध्ये गेल्या काही वर्षात झालेली कामे ही कमी प्रतीची झाल्यामुळे जल साठ्यांमधून गळती होत होती असे निदर्शनास आले. त्यानंतर ही योजना कार्यान्वित करण्यासाठी लागणारे सर्वतोपरी प्रयत्न रोहित पवार यांनी केले.
मुख्यमंत्री जलसंवर्धन योजनेअंतर्गत कर्जत व जामखेड तालुक्यातील विविध बंधारे व पाझर तलावांची दुरूस्ती करण्यात येणार आहे. यामध्ये कर्जत व जामखेड तालुक्यातील एकूण 69 जलसाठ्यांच्या दुरुस्तीची कामे मंजूर करण्यात आली आहेत. संबंधित जलसाठ्यांच्या दुरुस्ती कामासाठी आमदार रोहित पवार हे सतत पाठपुरावा करत होते.
त्यांच्या या पाठपुराव्याला यश आलं असून पाझर तलाव व बंधाऱ्याच्या दुरुस्ती कामासाठी एकूण 11 कोटी 79 लाख रुपयांच्या रकमेची तरतूद करण्यात आली आहे. या दुरुस्ती कामामुळे पाण्याचा होणारा अपव्यय तर टाळता येईलच, शिवाय पाणीसाठ्यातही वाढ होईल.
“कर्जत व जामखेडच्या जनतेला जास्तीत जास्त शासकीय योजनांचा लाभ मिळावा यासाठी मी कायमच प्रयत्न करत असतो. ते यापुढेही करत राहील. तसेच या योजनेसाठी मृदा व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख साहेब यांनी मान्यता दिल्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो.”
– रोहित पवार (आमदार)