नगर -क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत येणाऱ्या बहुतांश शाखा ग्रामीण भागातील आहेत. त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांच्या अडचणी समजून घेऊन त्यांना वित्तीय सहाय्य देऊन आधार देण्याचा मानस आहे, असे क्षेत्रिय कार्यालयाचे विभागीय व्यवस्थापक सुनील कुमार व दीपक कांबळे यांनी सांगितले.
शहरातील स्टेशन रस्त्यावरील युनियन बॅंक ऑफ इंडियाच्या शाखेत सात जिल्ह्यांचा समावेश असलेल्या क्षेत्रीय कार्यालयाचे कामकाज सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या हस्ते केक कापून सुरु करण्यात आले आहे. फिजीकल डिस्टन्सचे पालन करुन हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी ते बोलत होते.
यावेळी मुख्य प्रबंधक ज्ञानेश्वर साळुंके, गिरीश देशपांडे, विजय कुमार, मुशीर खान, अच्युत देशमुख, धोंडीराम गायकवाड, सुधाकर जोशी आदींसह नगर शहरातील शाखेचे प्रबंधक उपस्थित होते.
कॉर्पोरेशन बॅंक व आंध्रा बॅंक या दोन बॅंकांचे युनियन बॅंक ऑफ इंडियामध्ये 2 एप्रिल पासून समावेश करण्यात आल्याने युनियन बॅंक ऑफ इंडिया भारतातील पहिल्या पाच क्रमांकामध्ये आली आहे. या क्षेत्रिय कार्यालयाचा नगरसह 7 जिल्ह्यातील नागरिकांना लाभ मिळणार आहे. यामध्ये औरंगाबाद, जालना, बीड, लातूर, उस्मानाबाद आणि सोलापूर या सात जिल्ह्याचा समावेश आहे. या क्षेत्रिय कार्यालयातील अंतर्गत 79 शाखा आहेत. या क्षेत्रिय कार्यालय अंतर्गत येणाऱ्या बहुतांश शाखा ग्रामीण क्षेत्रातील असल्यामुळे सर्व शेतकरी बांधवांच्या अडचणी समजून घेऊन त्यांना वित्तीय सहाय्य देऊन आधार देण्याचा मानस आहे.