पिंपरी – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने शहरात ठिकठिकाणी उद्याने, मैदाने तसेच विरंगुळा केंद्र आदी सुविधा नागरिकांसाठी देण्यात येत आहेत. परंतु काही नागरिक या सोयीसुविधांचा गैरवापर करताना दिसून येत आहेत. महापालिकेच्या हद्दीतील एका उद्यानात चक्क विवाह सोहळे, साखरपुडा आदी कार्यक्रम पार पाडत आहेत. त्यामुळे उद्याना खेळण्यासाठी की विवाह सोहळ्यांसाठी असा प्रश्न निर्माण झाला आहे.
परंतु महापालिकेच्या अधिकाऱ्यांना याचा तपास नाही. त्यामुळे उद्यानात फिरण्यासाठी येणाऱ्या नागरिकांची गोची होत आहे. असे कार्यक्रम बंद करावेत, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेने नागरिकांचे आरोग्य चांगले राहवे, त्यांना मोकळा श्वास घेता यावा यासाठी ठिकठिकाणी उद्याने विकसित केली आहेत. या उद्यानांमध्ये लहान मुलांसह तरुण, युवक तसेच ज्येष्ठ नागरिक या धकाधकीच्या जीवनातून मोकळा श्वास घेण्यासाठी व फेरफटका मारण्यासाठी येत आहेत. परंतु काही नागरिक या उद्यानांमध्ये वैयक्तिक कार्यक्रम घेऊन परिसरातील इतर नागरिकांची गोची करत आहेत.
चिंचवड परिसरातील महात्मा फुलेनगर येथे सिद्धार्थ गौतम बुद्ध उद्यान आहे. सध्या सुटीनिमित्त येथे पर्यटकांची संख्या वाढत आहे. उद्यानात खेळण्यासाठी येणाऱ्या मुलांची संख्याही अधिक आहे. महापालिकेने पर्यटनासाठी विकसित केलेल्या उद्यानामध्ये मात्र गेल्या काही दिवसांपासून या लग्न समारंभ होत आहेत. सध्या विवाहाचे मुहूर्त असल्यामुळे सिद्धार्थ गौतम बुद्ध उद्यानात सातत्याने विवाह समारंभ होत आहेत. साखरपुडा आणि जेवणाच्या पंगती झाल्यानंतर त्या ठिकाणी सर्वत्र घाण पसरलेली असते, कचरा असता व्यस्त पडलेला असतो. दुसऱ्या दिवशी सकाळी उद्यानात फेरफटका मारणाऱ्या नागरिकांनाच उद्यानातील झाडलोट करावी लागते.
सार्वजनिक उद्याने नागरिकांचे आरोग्य सुदृढ राहण्यासाठी विकसित केली आहेत. अशा उद्यानांत विना परवानगी विवाह समारंभाचा आयोजन केले जाते. त्यावर महापालिकेच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. या प्रकरणात महापालिकेच्या उद्यान अधीक्षक व उद्यान पर्यवेक्षक यांच्यावर सुद्धा निलंबनाची कारवाई करून सदर प्रकरणाची खातेनिहाय चौकशी झाली पाहिजे, असे स्थानिक नागरिकांची मागणी आहे.
उद्यान विभाग अनभिज्ञ
महापालिकेच्या सिद्धार्थ गौतम बुद्ध उद्यानात मागील काही दिवसांपासून विवाह सोहळे आणि साखरपुडा आदी कार्यक्रम होत आहेत. परंतु महापालिकेच्या उद्यान विभागाला याची भनक पण लागलेली दिसून येत नाही. त्यामुळे या उद्यानाची देखभाल करणाऱ्या कर्मचारी, अधिकारी, पर्यवेक्षक विचारले असता अनभिज्ञ असल्याचे कळाले. मग उद्यानाचे पर्यवेक्षक आणि सुरक्षारक्षक नेमके काय करतात, असा प्रश्न उपस्थित होत आहे.