पुणे – महावितरण प्रशासनाने वीज ग्राहकांना अचूक बीले देण्याचा प्रयत्न सुरू केले आहे. ज्यांच्या मीटरसंदर्भात तक्रारी आहेत. त्यांना तातडीने बदलून देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यासाठी सर्व परिमंडलांना वीजमीटर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
महावितरण प्रशासनाला “रोलॅक्स’ आणि “फ्लॅश’ या वीजमीटर बनविणाऱ्या कंपन्यांच्या माध्यमातून मीटरचा पुरवठा होतो. मात्र, वापरात आल्यानंतर ते सदोष असल्याचे स्पष्ट झाले होते. वीजेचा वापर न करताही बहुतांश ग्राहकांना प्रमाणापेक्षाही अधिक वीजबीले येत होती. त्यामुळे राज्यभरातील पंधरा लाखाहूनही अधिक ग्राहकांनी स्थानिक कार्यालयात तक्रारी केल्या होत्या. त्यावरून महावितरणचे अधिकारी आणि ग्राहक यांच्यामध्ये वादही झाले होते. मात्र, या तक्रारींची सत्यता पडताळून पाहिल्यानंतर या मीटरमध्ये दोष असल्याचे स्पष्ट झाले होते.
त्यामुळे महावितरण प्रशासनाने आतापर्यंत पंधरा लाखाहूनही अधिक वीज ग्राहकांना वीजमीटर बदलून दिले आहेत. असे असले तरी तक्रारींचा ओघ कमी झालेला नाही. त्यामुळे तक्रारींची सत्यता पडताळून पाहाण्यात येणार असून त्या ग्राहकांना वीजमीटर बदलून देण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.
“इन्फ्रा’च्या माध्यमातून पतपुरवठा
महावितरण प्रशासनाकडून राज्यात वीज यंत्रणेची पायाभूत सुविधा सक्षम करण्यावर भर देण्यात येणार आहे. त्यासाठी “इन्फ्रा’च्या माध्यमातून पतपुरवठा करण्यात येणार आहे. त्यासंदर्भात मुख्य कार्यालयाने सर्व परिमंडलाकडून त्यांच्या भागातील वीज यंत्रणेचा लेखाजोखा आणि सद्यस्थितीची माहिती मागविली आहे, अशी माहिती महावितरणचे मुख्य जनसंपर्क अधिकारी पी. एस. पाटील यांनी दिली. ट्रान्सफार्मर, फिडर पिलर आणि वीजवाहिन्या यांची या निधीच्या माध्यमातून दुरुस्ती करण्यात येणार आहे. त्याशिवाय गरज असेल त्याठिकाणी ही यंत्रणा नव्याने उभारण्यात येणार आहे. त्याशिवाय त्यांची क्षमता वाढविण्यात येणार आहे. त्यांचा अहवाल मुख्य कार्यालयाला प्राप्त झाल्यानंतर त्यासंदर्भात कार्यवाही सुरू करण्यात येणार आहे, अशीही माहिती पाटील यांनी दिली.