नवी दिल्ली – लोकसभा निवडणुकीतील ऐतिहासिक विजयामुळे भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये उत्साहाचे वातावरण आहे. अशामध्ये आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांनी राम मंदिराविषयी सूचक वक्तव्य केले आहे. उदयपूरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून चार दिवसीय प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते.
रामाचे काम करायचे आहे आणि रामाचे काम होणारच. यावर लक्षही ठेवले जाईल, असे वक्तव्य मोहन भागवत यांनी केले आहे. मोहन भागवत यांच्या वक्तव्यात राम मंदिराचा उल्लेख नसला तरीही त्यांचा रोख त्या दिशेनेच असल्याचा कयास बांधला जात आहे.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या आधीही आरएसएसने राम मंदिरासंबंधी भाजपा सरकारप्रती नाराजी व्यक्त केली होती. राम मंदिरासाठी अध्यादेश आणावा, अशी मागणी विश्व हिंदू परिषदेकडून करण्यात आली होती. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची वाट पाहावी, असे स्पष्ट केले होते.