कोल्हापूर – मराठी नववर्षाच्या स्वागताचा पहिला दिवस, गुढीपाडव्याचा सण पारंपारिक पद्धतीने मोठ्या उत्साहात साजरा झाला. दारोदारी उभारण्यात आलेल्या गुढ्या, रांगोळीची आकर्षक सजावट आणि परिचितांना दिल्या जाणाऱ्या नवनवर्षाच्या शुभेच्छांची दिवसभर रेलचेल होती. शहरासह जिल्ह्यात पारंपारिक पद्धतीने सण साजरा करण्यात आला. येथील माळकर कुटुंबीयानं रितीरिवाजाप्रमाणे ऐतिहासिक भवानी मंडपाला साखरेच्या माळेचं तोरण बांधले.
माळकर कुटूंबियांतर्फे गेल्या चार पिढीपासून भवानी मंडपाला तोरण बांधण्याची परंपरा सुरू आहे. आमदार राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते तोरण भवानी मंडपाला बांधण्यात आले. सकाळी अकरा वाजता साखरेची माळ बांधण्यात आली. कोल्हापूर संस्थानचे तत्कालीन छत्रपती राजाराम महाराजांना कन्यारत्न झालं, तेव्हा आनंदोत्सव म्हणून रामचंद्र माळकर यांनी विशिष्ट साच्यातील साखरेची माळ बनविली. 25 फुटांची असणारी ही साखरेची माळ त्यावेळी राजवाड्याचे प्रवेशद्वार असणाऱ्या भवानी मंडपाला तोरण म्हणून बांधण्यात आली होती. ही परंपरा आजतागायत अखंड सुरू आहे. यंदाही शिवसेनेचे आमदार राजेश शिरसागर यांच्या हस्ते आणि नगरसेवक ईश्वर परमार, निखिल माळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत २१ किलोची आणि २१ फुटांची माळ भवानी मंडपाला बांधण्यात आली.