नगर: नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचा आवाज दिल्ली दरबारी पोहचवून या ऐतिहासिक शहराच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्राकडून भरीव स्वरूपाचा निधी मिळवून आणू व शहराच्या विकासाला चालना देऊन महानगर म्हणून विकसित करू, अशी ग्वाही आ. संग्राम जगताप यांनी दिली.
लोकसभा निवडणुकीसाठी कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस व मित्र पक्ष आघाडीचे उमेदवार आ. जगताप यांच्या नगर शहरातील प्रचाराचा प्रारंभ आज सकाळी शहराचे ग्रामदैवत माळीवाडा येथील श्री विशाल गणेश मंदिरात महाआरती करून करण्यात आला. यावेळी आ. जगताप यांनी माळीवाडा परिसरात प्रचार फेरी काढत मतदारांशी संवाद साधला.
या वेळी पक्षनिरीक्षक अंकुश काकडे, माजी महापौर अभिषेक कळमकर, हमाल पंचायतीचे जिल्हाध्यक्ष अविनाश घुले, माजी उपमहापौर दीपक सूळ, प्रा. माणिकराव विधाते, संजय घुले, विजय गव्हाळे, ज्ञानेश्वर रासकर, दत्ता खैरे, सोमनाथ धूत, बाळासाहेब भुजबळ, किसनराव लोटके, प्रा. अरविंद शिंदे, विष्णू म्हस्के, कुमार नवले, अण्णा दिघे, महिला आघाडीच्या निर्मला मालपाणी, रेश्मा आठरे, रेखा जरे, शारदा लगड, सुरेखा कडूस, अंजली आव्हाड, अर्चना देवळालीकर यांच्यासह नगरसेवक, कार्यकर्ते उपस्थित होते.
आ. जगताप म्हणाले, नगर शहरातील जनतेने मला दोन वेळा महापौरपदाची संधी दिली. त्यामाध्यमातून केलेल्या कामाची पावती म्हणून शहराचे आमदार म्हणून काम करण्याची संधी दिली. त्यामुळे गेल्या चार वर्षापासून शासनाच्या विविध योजना जनते पर्यंत पोहचविण्याचे काम केले जात आहे.