मे महिन्याच्या अखेरीस मी गावाकडे गेलो होतो. मागच्या खेपेला ज्या आंब्याच्या सावलीत विसाव्याला बसलो होतो. तो आंबा उतरवून त्याची आढी लावली होती. लेकुरवाळा आंबा दूर गेलेल्या लेकरांच्या आठवणीने सुकून गेल्यासारखा दिसत होता. मागच्या वेळी मी याच आंब्याच्या झाडाचा पाड खाल्ला होता. तृप्तीची ढेकर दिली होती. पण मी फेकून दिलेली कोय आणि साल आसपास दिसत नव्हती. बहुदा कुणा जनावराने ती खाऊन टाकली असावी अथवा रानाची मशागत करताना, काकऱ्या-पाळी घालताना मातीखाली गेली असावी. उन्हाचा ताप कमी झालेला नव्हता. गड्याने आंब्याभोवतीच्या रानाची मशागत केल्यामुळे रान हवार झालं होतं. तापलेल्या उन्हाने जमिनीतलं पाणी शोषून घेतलं होतं. विहिरी खोल गेल्या होत्या. पाण्याअभावी ऊस सुकू लागला होता. सुकू लागलेल्या पानांच्या आडून उसाचे डोळे पावसाची वाट बघत होते. उसाचा जारवा मातीत खोलवर शिरून हाताला येईल तेवढा गारवा उसाच्या कांड्यांकडे पाठवत होता. पण तेवढ्या गारव्याने सगळ्याच पानांची तहान भागात नव्हती. जमिनीलगतची पानं स्वतः तहानलेली राहात होती. शेंड्याच्या कोवळ्या पानांकडे गारवा पाठवत होती. स्वतः सुकून जात होती. उसापासून गळून पडत होती. गळून पडताना, अखेरचा श्वास घेताना, शेंड्यावरच्या हिरव्या पानांची वाऱ्यावरची थरथर बघून सुखावत होती.
डोहात गुढघाभर पाणी उरलं होतं. त्यातील माशांना आपलं जग आक्रसून गेल्याचं दुःख वाटत होतं. तेही पावसाची, ओढ्यानाल्यांच्या खळखळाटाची वाट बघत होते. चिमण्या चोचीपुरत्या पाण्यासाठी भिरभिरत होत्या. पंख फडकावून थकून जात होत्या. पण चोचभर पाणी पिऊन मरणाची सावली दूर ढकलत होत्या. माणूस मोटारी लावून विहिरी, बारवा खरडून घेत होता. आपली आणि दावणीच्या जनावरांची तहान भागवत होता. आभाळाकडे बघत पावसाला साकडं घालत होता. भोवतालावर पसरलेली निराशेची सावली बघून मी निराश मनाने पुण्याला परतलो.
पुण्यातल्या सिमेंटच्या रस्त्यावरची वाहतूक माझ्या मनाला भुरळ घालत नव्हती. मी खिडकीएवढ्या आभाळात पावसाचा शोध घ्यायचो. पुण्यात दोन-चार सरी पडल्या की आशाळभूतपणे गावाकडे गड्याला फोन लावायचो. “तिकडे पडतोय का पाऊस?’ असं विचारायचो. त्याचा नकार ऐकून मनात निराशा दाटून यायची. मनातला पाऊस विझून जायचा. सुकू लागलेल्या उसाची काळजी वाटायची. “इकडं काय काम आहे तुझं? तिकडे माझ्या शेतावर जाऊन पड की? असं मी पावसाला खडसवायचो. तो त्याच्या सरी आवरत्या घ्यायचा. माझ्या डोळ्यासमोरून चालता व्हायचा. मला वाटायचं, बहुधा गेला माझ्या गावाला. मी पुन्हा गावाला फोन लावायचो. गड्याचा पुन्हा नकार यायचा आणि मग “पाऊस माझ्यावर रुसला की काय?’ असं वाटून मी मनातल्या मनात पावसाला “सॉरी’ म्हणायचो. त्याच्यासमोर गुडघे टेकायचो. नाक घासायचो. कान धरायचो. मी रागावल्याने की काय कुणास ठाऊक आभाळ अगदीच काळवंडून जायचं. काळंभोर व्हायचं. ढगांनी गच्च झालेलं आभाळ बघून मनाला पुन्हा आशेची पालवी फुटायची.
पावसाने पुण्यावर रिपरिप धरली. गावाकडेही पाऊस पडत असल्याचा गड्याचा फोन आला. चांगला पाऊस झाला होता. मातीला ओल आली होती. वापश्यासाठी वाट बघावी लागली. वापसा आला. गड्याने मका पेरली. मला पुण्यात बसूनसुद्धा रानात कोंभारलेली मका दिसत होती. ती उगवून येत असल्याचं, रान हिरवं होत असल्याचं जाणवत होतं. आयुष्य जगून झाल्यावर सुकून जाणारी मका मी प्रत्येक वर्षी बघत असतो. मळणीयंत्रातून जाताना दाणे वेगळे टाकून भुसा होताना मका खुशीत असायची. भूरभूरत भुसा होऊन एका बाजूला पडायची. दाणे माझ्या ओंजळीत घालायची. मकेचे दाणे पुन्हा अंकुरण्याची आशा धरून पोटातल्या अंकुराला जपायचे. काहींना आपल्या लाह्या होतील याची काळजी नसायची. काही दाण्यांना आपण भरडले जाऊ याची चिंता नसायची. काही दाण्यांना तर आपण जनावराच्या मुखी जाऊ शकतो याचीसुद्धा जाणीव असावी. पण कोण अखेरचा श्वास घेतं आहे आणि कोण पुन्हा जन्माला येणार आहे, याचा विचार ते करत नसावेत. काही झालं तरी आपलं आयुष्य कारणी लागणार आहे याची त्यांना जाणीव असावी. त्यामुळे सगळ्यांच्याच कायेवर सोन्यासारखं पिवळं धम्मक सुख झळकताना दिसायचं.
मी गावाकडे पोहोचलो. तेव्हा सगळी मका उगवून आलेली बघितली. हिरवेगार झालेलं रान बघून माझं मनसुद्धा हिरवेगार झालं. मी रानातून फिरत होतो तेवढ्यात रिमझिम सरी आल्या. आधीच्या जोरदार पावसाच्या माऱ्यामुळे वाकून गेलेल्या झाडाझुडपांना गवतकाड्यांना या हलक्या सरी, जणू काही आई होऊन कुरवाळत होत्या. सरींची माया बघून हिरव्या निसर्गाला हसू फुटलं होतं. झाडांच्या, वेलीफुलांच्या अंगावरून ते पाण्याचे थेंब होऊन ठिपकत होतं. रानातील उसाच्या पानावरून रिमझिमणाऱ्या सरी उसाच्या डोळ्यात उतरायच्या. थेंब होत व्हायच्या. टपटपत जमिनीवर उतरायच्या. उसाच्या जारव्याशी जायच्या. त्यांच्याशी संवाद साधायच्या. मुळांच्या कडेने गारव्याचं रिंगण धरायच्या. जगण्याची आशा पेरायच्या. ऊस नव्या उमेदीने आभाळाकडे झेप घ्यायचा. उंच व्हायचा.
ओढे वाहू लागले होते. मासोळी पाण्याच्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने पोहत होती. जणूकाही तिला माझ्या रानाचं शिवार सोडून दूर जायचं नव्हतं. अवतीभोवती सगळीकडे हिरवीगार चादर पसरलेली दिसत होती. त्यामुळे आंब्याच्या पानांच्या हिरव्या गारव्याची गरज भासत नव्हती. रिमझिमणाऱ्या सरी बघून मन सुखावत होतं. पण मुक्काम वाढत होता. उघडीप हवी होती. मका खुरपायची होती. तिला खत टाकायचं होतं.
पावसाच्या सरींनी केलेली माया बघून झाडं-झुडपं, पीक-पाणी तरारलं. वाऱ्याच्या झुळकेशी हितगुज करत निसर्ग डोलू लागला. माझ्या शिवारातलं पीक-पाणी खुशीत असल्याचं बघून पावसाच्या सरी पुढल्या गावाला निघून गेल्या. पावसाने उघडीप दिली. वापसा आला. मका खुरपायला सुरुवात केली. गड्याने चार दोन हातावर नजर नेली आणि तिकडे बोट दाखवत म्हणाला, “तो तिथं आंबा उगवला आहे. तो ठेवू, का काढून टाकू?’ मी म्हटलं, राहू दे. मी उगवून आलेल्या आंब्याच्या जवळ गेलो. मी टाकून दिलेल्या कोयीच्या जागीच तो आंबा अंकुरला होता. कोवळ्या लुसलुशीत पानांमधून हसत होता. वाऱ्यावरती डोलत होता आणि जणू काही मला सांगत होता-
पुन्हा जन्मण्या असते मरणे
विजयी होण्यासाठी हरणे
विजय शेंडगे