हल्ली सेन्सर बोर्डच्या हरकतींची चर्चा नेहमीच ऐकायला मिळते. मध्यंतरीच्या काळात, विशिष्ट विचारसरणीच्या लोकांची नेमणूक या मंडळावर झाल्यानंतर त्यांनी लावलेल्या प्रत्येक कात्रीकडे वेगळ्या चष्म्यातून पाहिले जायचे आणि त्याचा बभ्रा व्हायचा. आता तशी चर्चा होत नाही याचा अर्थ सेन्सॉर बोर्डाकडून हरकती घेतल्या जात नाहीत असा नाही. किंबहुना काही वेळा निर्माते-दिग्दर्शक आपणहूनही सिनेमामध्ये किंवा त्यांच्या नावांमध्ये बदल करत असतात.
सध्या नावबदलावरून एका चित्रपटाची चांगलीच चर्चा सुरू आहे. ही चर्चा रंगण्यास कारण म्हणजे या चित्रपटाचे नाव दुसऱ्यांदा बदलण्यात आले आहे. अभिनेत्री जान्हवी कपूर सध्या राजकुमार रावसोबत आगामी “रुही अफ्जाना’ या चित्रपटात झळकणार आहे. हा एक हॉरर कॉमेडी चित्रपट आहे. या चित्रपटाचे आधीचे नाव “रुह अप्जा’ असे होते. पण त्यानंतर ते बदलून “रुही अफ्जा’ ठेवण्यात आले.
आता पुन्हा त्यात बदल करून “रुही अफ्जाना’ करण्यात आले आहे. या चित्रपटाच्या फर्स्ट लूकमध्ये जान्हवी, राजकुमार यांचे चेहरे अत्यंत भेदरलेले दिसतात. चित्रपटात या दोघांबरोबरच वरुण शर्माही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन हार्दिक मेहता करत आहे.