उन्हाच्या कोवळ्या गूढ स्पर्शाची जाणीव होते. पण ती जाणीव मनात रुजण्यासाठी मनाचे वयही तसेच कोवळे हवे. प्रेमाची पहिली अनुभुती…त्यातील हुरहुर… प्रियाचे आभास… त्याची गुंतवण… त्याचे घट्ट विणीचे रुजलेले स्पर्श… जणूकाही त्या स्पर्शाने देह धारण करावा अन् फुलवावी सावली… त्या अधुऱ्या सहवासाची…”तो स्पर्श उन्हाचा होता… ही रुजून आली छाया…’ उन्हाच्या एका स्पर्शानं सावलीला धुमारे फुटतात. ती नवोढा होते. नुकतेच तारुण्य फुललेली ती उन्हाच्या आभासात विरघळते, रुजते. ओढून घेते उन्हाचे विरघळ अन् पसरत जाते स्वतःचे अस्तित्व, उन्हाला पायघड्या म्हणून.आकाशाची उजळण करण्यासाठी ती प्रणयअधिरा मृण्मयी स्वतःच्या हिरवाईची ज्योत तेजाळते.
जणू काही ती सांगत असावी-
बघ, हे बैरागी अंबरा
बघतरी एकवार डोकावून
तुझ्या प्रतिक्षेत मी पंचप्राण रुजवलेत
जे उगवून आलेत तृणगर्भातून
हे तुझेच तर दान आहे जे,
मी जपलेय अविरत
मी योगिनी तितिक्षेच्या गाभाऱ्यात…
तुझी स्थापना करून वाट पाहतेय रात्रंदिन
तुझ्या बरसण्याची
जसे की, ती वेडी सावली घुटमळते अन्
उन्हाच्या पाऊलखुणा वेचते ओंजळीत.
लपवते स्वतःला त्याच्या
हिरव्या सुफळतेत..!
धरा अन् सावली दोघी सारख्याच तर आहेत. ऊन आणि आकाशाशी ऋणानुबंध जपतानाही त्यांचे मोठेपण जपणाऱ्या. स्वतःमधल्याच तितिक्षा.त्यांच्यातली हीच एकूटवाणी हुरहुर मलाही विरहिणी बनवते.
पानांच्या हिरवाईचे नक्षत्रलेणे अन् पात्यांवरचे मंतरलेले धुके मग मी सांज होऊन वेचत राहते. झरझरणारे ऋतू जाणते होतात. पावसाला पापण्यांतच थोपवतात. एकदाच उमलून येते पापणी. एकदाच आभाळ बघून जाते.क्षणभरात पुसून जातात खच; साठलेल्या नक्षत्रांचे. पावसाचे येणे हा सरींचा हंगाम आणि गेल्यावर रिक्त मेघ. मधेच ओलावणारे अंबर, धरती कवेत घेते अन् “परत कधी’चे रातराणी बोल मिठीच्या उत्तरात विरघळतात. प्रत्येक भेटीच्या तळाशी दडलेला विरह सांगत राहतो, क्षणांनी ओठांवर अंथरलेले ओथंबगाणे. त्याच क्षणांच्या साक्षीने वितळतात अनासक्त नशीबरेषा एकत्र, एकमेकांसाठी. मातीचे मन साद घालत राहते शुष्क कोरडे भास जोजवत. जणू मल्हारधुन कुठूनशी उजेड माखून यावी अन् सुखाच्या क्षणांनी गावे भिंगुळवाणे गाणे समरसून. तेव्हा तप्त उन्हाळ मनावर व्हावा आठवांचा हलकासा शिडकावा. हजारो मैल अंतरावरही एकच गाणे लहरावे मनात. एकच लय भिनत असावी. एकाच समेवर थांबावी. स्वल्पविरामांचेही अंतर शब्दांमधले एक असावे. पापणी पूर्ण मिटलेली नसावी. पैल असो वा ऐल किनार. तितिक्षा जिवंत राहावी…
खुदको सिमटनेकी कोशिश है जारी
चलो देखते है… दामन क्या करता है…
अशाच एका वैशाखातल्या न संपणाऱ्या दिवशी
खिडकीतून वैशाखी संध्याकाळ न्याहाळताना वाटतं गुलमोहराच्या पाकळ्या झराव्यात आणि त्यांच्यातून जणू शिडकावा व्हावा सावलीचा उन्हाच्या तापल्या मनावर. त्याचवेळी सहज नजर जाते दूरवरच्या नदीकाठावर तर नदीकिनारी कुणी तापलेला बहर उदासलेल्या दुपारी बाजूला सारत सांजगारवा शोधताना दिसतो. नदीच्या वाहत्या जिवात मिसळतो हरवलेला जोगिया. उन्हाची काहिली पाहून सावली थरथरते अन् धावते उन्हाच्या बहराला कवेत घ्यायला. जणू मनात म्हणत असावी तेव्हा,
सोच रही हूं खत लिखने की,
लेकिन क्या पैगाम लिखूं,
तुझ बिन कटी रात लिखूं,
या साथ गुज़ारी शाम लिखूं…
उधाणलेल्या मनात क्षितिजरेघांची बिंब उमटतात. तरूंची काया मिसळू लागते एकमेकांत. उन्हाचा सावलीच्या देहातला परतीचा प्रवास सुरू होतो आणि विरघळतो सांजछायेत पुनः पुन्हा. सावलीला उन्हाच्या श्वासांचे भास जाणवतात. ती तिथेच थबकते. अस्वस्थ अनावर चौकटीत बांधलेली. दूर जाणाऱ्या उन्हाकडे अनिमिष नेत्रांनी बघत. एकटक
क्षितिजरेघेसारखी स्तब्ध. विरहिणी. उन्हानं थकून सावलीतच बस्तान मांडलेलं असतं तेव्हा अन् कवडशांच्या चिमण्या खापऱ्यांवर, तुळशीच्या अंगणात, पिंपळाच्या डेऱ्यात खेळू लागतात. अबोल पणत्या मनात तेवायला लागतात. पारावरचा पिंपळ अंग झटकतो त्यासरशी पिटूकली पानं मातीत हुदड्या मारायला लागतात. पानांचा तो दंगा बघताना, आपले मातीत पसरलेले पिसारे झटकत ऊन एक लांबलचक सांजेची जांभई देते आणि दिमाखात क्षितीजाची वाट चालू लागते. त्याला परतताना पाहून ढगांचे चुकार अबलख वारू त्याच्या लवाजम्यात सामील होतात. नदीच्या काहूरवेणा तिन्हीसांज प्रसवत राहतात. गाई-म्हशींची धुळ माखली पावले परतीच्या किनाऱ्याला लागलेली पाहून.बगळ्यांची माळ, राव्यांचे थवे आणि मोरांच्या केकावल्या सुरू होतात आणि त्याचवेळी तो आसमंतात उधळायला सुरुवात करतो. आपले टप्पोर थेंब शिंपत सरसरून तो येतो आपल्या प्रेयसीच्या अलगद मिठीत. त्याचे अनपेक्षित येणे तिला मोहरून जाते.
क्षणांत तो उन्हाच्या पिसाऱ्यातून चोरलेली इंद्रधनूची मेखला तिच्या आभाळात रेखतो. ती लाजते, मोहरते, दरवळते. सलज्ज सांजेच्या पापण्या झुकतात अन् चांदणे बहरतात. वैशाखातल्या तप्त रात्री आपल्या तितिक्षेच्या प्रहरांचा अंत करत.
– ऊनसावली
मानसी चिटणीस