– मुगाच्या डाळीची धीरडी करताना मिश्रणात दोन चमचे तांदळाची पिठी घातल्यास धीरडी अधिक चविष्ट व कुरकुरीत होतात.
– बटाट्याचे परोठे करताना मिश्रणात थोडीशी कसुरी मेथी घातल्यास परोठे स्वादिष्ट होतात.
– इडलीसाठी डाळ-तांदूळ वाटल्यानंतर त्यात वाटीभर नारळाचे पाणी घातल्यास इडली अधिक स्पांजी व चवदार लागते.
– सॅलेड बनवण्याआधी भाज्या आणि फळं फ्रीजमध्ये ठेवा. पाहिजे त्या आकारात पटकन कापता येतात.
– भांड्याला कांद्याचा वास लागला असेल तर थोडा वेळ मिठाच्या पाण्यात घालून ठेवा.
– डोसा कुरकुरीत करण्यासाठी त्यात चिमूटभर मेथ्या व मूठभर पोह्याचा चुरा मिसळा.
– हाताला किंवा पाट्या-वरवंट्याला येणारा मसाल्याचा वास जावा म्हणून त्यावर कच्चा बटाटा किंवा लिंबू चोळा.
– मोड आलेली कडधान्ये अधिक काळ फ्रेश राहण्यासाठी त्यात लिंबाचा रस मिक्स करून फ्रिजमध्ये ठेवा.
– सुके खोबरे तूरडाळीत खुपसून ठेवले तर खराब होत नाही.
– दुधाला विरजण लावताना आतून थोडीशी तुरटी फिरवावी दही घट्ट होते.
– लसूण किंचित तव्यावर गरम केल्यास, कळ्यांची साल लवकर सुटते.
– कापलेलं सफरचंद लाल होऊ नये यासाठी त्यावर किंचित लिंबाचा रस लावावा.
– लोणी नेहमी निर्लेपच्या फ्रायिंग पॅनमध्ये कढवावे. बेरी अजिबात चिकटत नाही व भांडे पटकन स्वच्छ होते.
– मिक्सरची पाती धारदार ठेवण्याकरिता महिन्यातून किमान एकदा तरी साधं मीठ ग्राइण्ड करावं.
– तुरीची डाळ कुकरमध्ये शिजवताना त्यात चिमूटभर मीठ, हळद, हिंगपूड व थोडेसे तेल घालावे. डाळ नीट शिजते आणि स्वादही छान येतो.
– ताक केल्यावर लोणी काढण्यापूर्वी हाताला डाळीचे किंवा गव्हाचे पीठ लावून हात स्वच्छ धुवावा. लोणी हाताला अजिबात चिकटून राहात नाही.
– ताक आंबट असल्यास त्यात पाणी घालून ठेवावे. वरचे पाणी थोड्या वेळाने अलगद काढून टाकावे. आंबटपणा कमी होईल.
– पुदीना वाळवून पूड करून ठेवल्यास पटकन कधीही वापरता येते.
– शेंगदाणे भाजण्यापूर्वी दाण्याला पाण्याचा हात लावून मग भाजावेत. दाणे खमंग भाजले जातात.
– लिंबू 5-10 मिनिटे कोमट पाण्यात भिजवून रस काढावा. रस जास्त निघतो.
– शैलजा गोडांबे