सविंदणे : श्रीगोंदा, पारनेर तसेच शिरुर तालुक्यांतील शेतकरी गेली अनेक वर्षे आपला शेतीमाल मोठ्या प्रमाणात शिरुर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्रीसाठी आणत आहेत.
करोना काळानंतर वेळेत बदल करीत शेतकऱ्यांचा माल विक्रीसाठी कृषी उत्पन्न बाजार समितीने सायंकाळी 6 ते 9 ही वेळ निश्चित केली होती. त्यामुळे शेतकऱ्यांना सोयीस्कर झाले होते. परंतु ऐन थंडीच्या दिवसात माल विक्रीसाठी पुन्हा पहाटे 2 ते सकाळी 7 पर्यंत वेळ बदलण्याचा घाट शिरुर कृषी उत्पन्न बाजार समितीने घातल्याने शेतकरी आक्रमक झाले आहेत. काही ठराविक व्यापाऱ्यांच्या फायद्यासाठीच वेळ बदलण्यात येत असल्याचा आरोप संतप्त शेतकऱ्यांनी यावेळी केला आहे.
शिरुर तालुक्यातील जवळपास प्रत्येक गावात बिबट्याचे वास्तव्य आहे. सध्या मोठ्या प्रमाणात थंडी सुटली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. सध्या कोणत्याच मालाला बाजारभाव नसल्याने आधीच शेतकरी आर्थिक संकटात आहे. त्यातच शिरुर कृषी उत्पन्न बाजार समितीने शेतीमाल विक्रीची वेळ बदलण्याचा निर्णय घेतल्याने शेतकरी आक्रमक झाले आहेत.
नियोजनासाठी बैठक घेणार- ढोकले
याबाबत शिरुर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव अनिल ढोकले यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, सध्या सांयकाळी 6 वाजता बाजार समितीत मालविक्री केली जाते. परंतु जागा मिळविण्यासाठी शेतकरी लवकरच बाजार समितीत येतात. त्यामुळे तेथील व्यापाऱ्यांच्या ग्राहकांवर परिणाम होतो. बाजार समितीत कांदा मार्केट, सोयाबीन खरेदी चालू असते. त्याचेही नियोजन आम्हाला करावे लागते. अनेक शेतकऱ्यांनी पहाटे मार्केट चालू करण्याचीही मागणी केली आहे. त्यावर दुपारी 12:30 वाजता शिरुर येथील मार्केट कमिटीच्या कार्यालयात शेतकऱ्यांसोबत बैठक घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
शेतकरी सेना मैदानात
शिरुर बाजार समितीने या निर्णयाचा पुनर्विचार करावा, अशी मागणी करीत ठाकरे गटाची शिवसेना शेतकरी सेना आता मैदानात उतरली आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीला शेतकऱ्यांच्या वतीने निवेदन देण्यात आले. त्यामध्ये शेतकऱ्यांना शेतीमाल विक्रीसाठी सांयकाळी मार्केट खुले करावे, शेतमाल गाड्यांना पार्किंग सुविधा, पिण्याचे पाणी, शेतमाल विक्रीसाठी जागा, शेतकरी हा प्रथम मार्केट दुवा असल्याने त्याला सुविधा द्याव्यात, आदी मागण्या करण्यात आल्या. यावेळी शेतकरी सेना तालुकाप्रमुख योगेश ओव्हाळ, उपतालुकाप्रमुख अनिल पवार, जिल्हा समितीचे कैलास भोसले, तालुका सल्लागार संतोष काळे, शाखाप्रमुख आबासाहेब काळे, बहुजन मुक्ती पार्टीचे नाथा पाचर्णे, फिरोज सय्यद, शेतकरी उपस्थित होते.