‘कर्जमुक्ती योजनेची पहिली यादी जाहीर होणार म्हटल्यानंतर विरोधकांना पोटशूळ उठला’
मुंबई: आजपासून विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे. महाराष्ट्र विकास आघाडीच्या वतीने सादर करण्यात येणारा यंदाचा अर्थसंकल्प सर्व समाजघटकांना न्याय देणारा आहे. यातच आज कर्जमाफी मिळणाऱ्या शेतकऱ्यांची पहिली यादी विधानसभेत जाहीर होणार म्हटल्यानंतर आज सकाळपासूनच विरोधकांना पोटशूळ उठला. सौ चुहे खाके बिल्ली चली हज को, अशा आविर्भावात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपाचे आमदार यांनी विधानभवनात प्रवेश करताच रंग दाखवला, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे.
महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकारने सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफीत समावून घेण्यात आलेले नाही, असा आरोप करत विरोधकांनी पायऱ्यांवर बसून घोषणाबाजी केली. खरं तर अवघ्या राज्याचे लक्ष्य लागलेल्या या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधकांनी विधानपरिषद सभागृहात जाणीवपूर्वक गदारोळ केला. या गोंधळातच पुरवणी मागण्या पटलावर मांडाव्या लागल्या आणि विधानपरिषदेचे कामकाज तेराव्या मिनिटालाच गुंडाळावे लागले. विरोधकांकडून सहकार्याची अपेक्षा होती. पण विरोधक सदस्यांकडून झालेला गोंधळ विधिमंडळाच्या वरिष्ठ सभागृहाला अशोभनीय आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कर्जमुक्त आणि चिंतामुक्त करू असे सांगणाऱ्या फडणवीस सरकाने शेतकऱ्यांना फसवले नसते तर आज पायऱ्यांवर बसून रंग दाखवण्याची ही वेळ आली नसती, अशी खोचक टीका देखील राष्ट्रवादीने केली आहे.