गुंजाळवाडी, आर्वी, पिंपळगाव परिसरातील शेतकरी अडचणीत
खोडद – नुकताच हलका पाऊस झाला असला तरी राज्यातील सर्व जनता अजूनही दुष्काळाने होरपळत आहे. मागील वर्षी पाऊस न पडल्यामुळे आणि सध्या जून महिना संपत आला तरीही पावसाने दमदार हजेरी न लावल्यामुळे गुंजाळवाडी, आर्वी, पिंपळगाव परिसरात 1972 पेक्षाही भयंकर दुष्काळी परिस्थिति निर्माण झाल्याने या भागातील शेतकरी अडचणीत सापडला आहे.
यंदाच्या भीषण दुष्काळाचा सामना करण्यासाठी शासन सर्व लोकांना पाणी वाचविण्याचे आवाहन करत आहे. बऱ्याचशा भागात शेतीसाठी सोडाच; परंतु पिण्यासाठी हंडाभर पाणी मिळेनासे झाले आहे. दोन दिवसांपासून राज्यात काही ठिकाणी अल्प प्रमाणात पाऊस होऊन दिलासा मिळाला असला तरी जुन्नर तालुक्यातील गुंजाळवाडी, आर्वी भागांतील शेतकरी मोठ्या पावसाची वाट पाहत आहेत. जुन्नर तालुक्यात असणाऱ्या कुकडी प्रकल्पांतर्गत पाचही धरणांची पाणी पातळी खालावली असून कालव्याची आवर्तने बंद केली आहेत. या भागात प्रामुख्याने होणाऱ्या टोमॅटे, बटाटे, कांदा, द्राक्ष आदी नगदी पिके पाण्यावाचून जळू लागली आहेत.