नगर – गुरव समाज बांधव परंपरागत अल्पशा उत्पन्नावर मंदिरांची देखभाल, झाडलोट, पूजा करून आपला उदरनिर्वाह चालवितो. पुजारी बांधवास देवस्थानमार्फत मिळणारे उत्पन्न हे तुटपुंजे आहे. त्यांच्याकडे जगण्याचे दुसरे साधन नाही. त्यातच मंदिरे बंद असल्याने पुजाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व मंदिरांतील पुजारी यांना जीवनावश्यक वस्तू स्वरूपात मदत व आर्थिक साह्य मिळावे, अशी मागणी अखिल गुरव समाज संघटना, व गुरव समाज सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष अनिल तोरडमल यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.
लॉकडाऊन मुळे राज्यातील सर्वच मंदिरे बंद आहेत. देवाची मनोभावे पूजा करणारा पुजारी व कुटुंबीय अडचणीत आहेत. त्यांना जीवनावश्यक वस्तुंची मदत मिळणे गरजेचे आहे. शासकीय यंत्रणेकडून त्यांना जीवनावश्यक वस्तुंची मदत दिली जावी, असेही निवेदनात म्हटले आहे. शासन सर्व घटकांची जबाबदारी सरकार घेत आहे. त्यावर ठोस असे काहीच होऊ शकले नाही. अद्यापि आमचे प्रश्न सुटलेले नाहीत. समाज हा उपेक्षितच राहिला आहे.