मुंबई : उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोन्ही बंधुंनी काही दिवसांपूर्वी युतीचे संकेत दिले होते. राज ठाकरे यांनी अभिनेते महेश मांजरेकर यांना दिलेल्या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांच्यासोबतची भांडण फार किरकोळ आहेत, महाराष्ट्र मोठा आहे, असं विधान केलं होत. त्यांच्या या विधानाला तात्काळ प्रतिसाद देत शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी किरकोळ वाद बाजूला ठेवण्यास मी देखील तयार आहे, असं म्हटलं होतं. त्यानंतर दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्याची राज्यभर जोरदार चर्चा रंगली आहे.
अशातच आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने सोशल मिडिया एक्सवर एक पोस्ट केली आहे. “वेळ आलीये, एकत्र येण्याची मुंबई आणि महाराष्ट्रासाठी शिवसैनिक तयार आहे, मराठी अस्मितेच्या रक्षणासाठी” अशा आशयाची पोस्ट शिवसेना ठाकरेंच्या पक्षाच्या अधिकृत पेजवरून करण्यात आली असून सध्या ही पोस्ट चर्चेचा विषय बनली आहे.
शिवसेनेची पोस्ट चर्चेत…!
वेळ आलीयं, एकत्र येण्याची
मुंबई आणि महाराष्ट्रासाठी
शिवसैनिक तयार आहे,
मराठी अस्मितेच्या रक्षणासाठी!
प्रत्येक मराठी माणूस या क्षणाची आतुरतेने वाट बघतोय, कमेंटसचा पाऊस
या पोस्टद्वारे शिवसेना ठाकरे गटाने राज ठाकरे यांना पुन्हा साद घातली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली असून पोस्टवर कमेंटचा पाऊस पडत आहे. ‘लवकर एकत्र या, एकत्र या लवकर मग कशी मज्जा येते विरोधकांची ते बघायला संपूर्ण महाराष्ट्र आतुर आहे’. ‘प्रत्येक मराठी माणूस या क्षणाची आतुरतेने वाट बघतोय’. ‘एकदा घोषणा झाली की मग वादळ आणि फक्त वादळ’. ‘राजउद्धव’. अशा कमेंटसचा पाऊस पडत आहे.
दरम्यान, उध्दव ठाकरे आणि कुटुंबीय युरोप दौऱ्यावर आहेत. ते मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये मुंबईमध्ये परतणार आहेत. त्याचबरोबर मनसे अध्यक्ष राज ठाकरे देखील परदेशी दौऱ्यावर आहेत. राज ठाकरे 29 एप्रिलला मुंबईत परतणार आहेत. युतीच्या चर्चेदरम्यान ठाकरे बंधुंचा हा परदेश दौरा सुरू आहे. तर दोन्ही नेते मुंबईत परतल्यानंतर कोणता निर्णय घेणार, याकडे संपूर्ण राज्यच लक्ष लागून राहिले आहे.
वेळ आलीयं, एकत्र येण्याची
मुंबई आणि महाराष्ट्रासाठी
शिवसैनिक तयार आहे,
मराठी अस्मितेच्या रक्षणासाठी! pic.twitter.com/aukbsiNPK5— ShivSena – शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) April 26, 2025