दमयंती, ऐकलंस का? दिवेलागण करायची वेळ झाली. तुळशी वृंदावनासमोर अंधार पडलाय. उठ बरं.’ नानांनी माजघरात डोकावल्यासारखं केलं आणि काठीचा आधार घेत पडवीत येऊन उभे राहिले. वाऱ्याची एखादी मंद झुळूक येताच समोरच्या पिंपळाखाली पडलेला पाचोळा उगाच आपली कूस बदलत होता.
तळहाताचे कवडसे धरत फांदीच्या दाटिवाटीतून त्यांची नजर काहीतरी शोधत होती. “आज दर्शन चुकलं वाटतं.’ म्हणत नानांनी डोळे मिटून घेत दोन्ही हात जोडले आणि स्वतःशीच पुटपुटले. “भास्करा, नमस्कार स्वीकार रे बाबा. लोक उगवत्या सूर्याला नमस्कार करतात आणि आम्ही तुला! तुला कुशीत घेणाऱ्या आभाळाएवढं मन मोठं नाही माझं आणि आयुष्याच्या संध्याकाळी तू दिलेली साथ विसरून जाण्याइतपत स्वार्थी पण नाही.’ नाना घरात गेले. त्यांनी पुन्हा माजघरात डोकावल्यासारखं केलं. “आज पुन्हा मलाच दिवे लागण करावी लागणार वाटतं.’ नानांनी देवघरातल्या वाती घेतल्या, तुळशीसमोर दिवा लावला.
अंधार दाटून येत होता. नाना दिव्याच्या मंद प्रकाशात तिथेच बसून राहिले. नाना कापऱ्या आवाजात गुणगुणत होते. “भयं इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते, मी संध्याकाळी गातो तू मला शिकविली गीते.’ गाताना ते मध्येच थांबले आणि बोलू लागले. “आलीस तू? कशी अगदी अलगद पावलांनी येतेस ना! दिवसाच्या मिठीतून तुला सोडवत पण नाही आणि रात्रीच्या त्या काळोखात विरून जायची ओढ पण आहे तुझ्या मनाला! तुला म्हणून सांगतो, मी आणि माझी दमयंती तुझ्या वाटेकडे अगदी असेच डोळे लावून बसायचो. वेशीबाहेर तळ्याकाठी भेटण्यासाठी. तासन्तास एकमेकांत रमायचो. पाण्यात पडलेलं तिचं प्रतिबिंब चोरून बघताना पकडलो गेलो की; तिचं गालातल्या गालात हसणं काळजाला असं काही भिडायचं आणि मग आपसूकच तिच्यासाठी शब्दांची गुंफण करायचा मोह आवरता येत नसायचा. मला म्हणायची, “पाण्याला वाऱ्याचा स्पर्श झाला की हळुवार तरंग उठावेत ना तसे तुझे शब्द मला अंतर्बाह्य स्पर्शून जातात! कसं जमतं तुला? कधी कधी तर तुझ्या शब्दांचे अर्थ लावण्यातच ही सांजवेळ निघून जाते.’ “नकोस दवडत जाऊ ही सांजवेळ माझ्या शब्दांचे अर्थ लावण्यात. शब्दच ते. विरणारे. तुला डोळे भरून पाहू दे. या क्षणांना माझ्या आत कैद होऊन जाऊ दे!’ तिला अबोलीची फुलं खूप आवडायची. एकदा तिच्यासाठी फुलं घेऊन गेलो होतो. डोळे घट्ट मिटून फुलांचा वास घेत तिने विचारलं, “माळून देशील?’ काही वेळ स्तब्ध होऊन मी तिच्याकडे पाहातच बसलो. वाऱ्याने हलणारी तिच्या केसांची बट सावरत फुलं माळताना तिला पहिल्यांदाच स्पर्श केला होता. मी पुन्हा तिच्या पाण्यातल्या प्रतिबिंबाकडं पाहात होतो. तिने माझ्या हातातलं एक फूल घेऊन पाण्यात टाकलं आणि उठलेल्या तरंगात तिचं ते प्रतिबिंब वाहात जाताना मी ते हळुवार माझ्या ओंजळीत भरून घेतलं!
कधी निःशब्द होऊन एकमेकांकडे पाहातच बसायचो. त्या निरव शांततेत न बोलताही खूप काही बोलायचो. निरोप घेऊन ती जायला निघायची तेव्हा त्या निसटत्या क्षणात तिच्यापासून दूर होताना, तू देखील रात्रीच्या अंधारात मला एकटंच सोडून निघून जायची! कधी तू एकटी नाही यायची तर पावसाची सर सोबत असायची तुझ्या. आडोशाला म्हणून झाडाखाली थांबायचो; पण तो खोडकर पाऊस फांद्यावरून ओघळून तिला ओलंचिंब करायचाच आणि तिच्याकडे पाहताना मला पुन्हा शब्दांच्या फुलांची उधळण करायला भाग पाडायचा. आठवणींच्या बऱ्याच पाऊलखुणा मागे पडल्या. आज त्या पुन्हा आठवल्या, तुझ्या येण्यानं. अशीच एक आठवण आहे. तिने माझ्यासाठी तिच्या हाताने स्वेटर विणलं होतं.’ नाना भावव्याकुळ झाले होते. सोबत नसतानाही ते कुणाच्यातरी वाटेकडे डोळे लावून बसले होते. दमयंती हे जग सोडून कधीच गेली होती. पण हे वास्तव स्वीकारायला नाना तयार नव्हते. ते हरवून जायचे त्या “कातरवेळी’ तिच्या आठवणीत. तिचा भासच जणू त्यांच्या दमलेल्या श्वासाला त्राण देऊन जायचा!
दमयंतीला दिलेली हाक त्या चार भिंतीशिवाय कुणालाच ऐकू जात नव्हती! “दमयंती, ऐकतेस का? मला त्या संदुकीमधून स्वेटर काढून देशील?’ काही वेळ पुन्हा तिच भयाण शांतता. नानांचं पुन्हा माजघरात डोकावून पाहणं मनाची कालवाकालव करीत होतं. “बरं झोप. मीच घेतो.’ नानांनी संदुकीतून स्वेटर काढून ते अंगात घातलं. दोन गुडघ्यांच्यामध्ये थरथरणारी हनुवटी स्थिर करत ते बाहेरच्या मिणमिणत्या दिव्याकडं एकटक पाहात होते. त्यांचा कंठ दाटून आला होता. सारं बळ एकवटून ते मोठ्याने ओरडले. “भीती वाटते आता तुझी. सरता सरत नाहीस तू. दमयंती, तुझ्याशिवाय जीव कासावीस होतो. उद्याच्या कातरवेळी मला तुझ्या मिठीत यायचंय.’ पिंपळाच्या सळसळणाऱ्या पानांनी दिवा फडफडत होता आणि अखेरीस “तो’ विझलाच..!
आठवण
अमोल भालेराव