पुणे – लोकमान्य टिळक यांनी 1905 मध्ये भारताला स्वदेशी आणि बहिष्कार हे दोन महत्त्वाचे मूलमंत्र दिले. भारताच्या विकासासाठी स्वदेशी चळवळीची आवश्यकता त्यांनी आधीच जाणली होती.
लोकमान्यांच्या याच मूलमंत्राचे महत्त्व मी अनेक वर्षांपासून पटवून देण्याचा प्रयत्न करत आहे. स्वदेशीच्या मूलमंत्रावरच आज स्वयंपूर्ण भारत ही संकल्पना उभी राहिली आहे. त्यातूनच भारतात तयार होणाऱ्या अनेक वस्तू इतर देशांच्या वस्तूंच्या तुलनेत कमी दरात उपलब्ध होत आहेत, असे प्रतिपादन लडाख येथील प्रख्यात शास्त्रज्ञ आणि शिक्षणतज्ज्ञ सोनम वांगचुक यांनी शनिवारी केले.
यंदाचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल आपणास अतिशय आनंद होत असल्याच्या भावना वांगचुक यांनी व्यक्त केल्या. त्यांनी आपल्या व्हिडिओ संदेशात पुरस्काराबद्दल भावना व्यक्त केल्या. टिळक महाराष्ट्र विद्यापीठातर्फे दोन दिवसांच्या वेबीनार व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी वांगचूक यांच्या संदेशाचा व्हिडिओ दाखवण्यात आला.