नवी दिल्ली – आयपीएल स्पर्धेत करोडो रुपयांची बोली लावून स्टार खेळाडूंना आपल्या संघात खरेदी करत असलेल्या विविध संघांना यंदाच्या स्पर्धेतून फारसा लाभ होण्याची शक्यता नसल्याचे दिसत आहे. तिकीट विक्री, प्रक्षेपण हक्क व जाहिरातींच्या टक्केवारीचा लाभ यंदा संघ मालकांपेक्षा बीसीसीआयलाच होणार आहे. त्यामुळे बीसीसीआय तुपाशी व संघ मालक उपाशी असेच स्वरूप यंदाच्या आयपीएल स्पर्धेचे राहील, असे स्पष्ट दिसत आहे.
करोनाचा धोका सुरू होण्यापूर्वी संघ मालकांना मुख्य प्रायोजकाकडून मिळणारा लाभांश, प्रक्षेपण हक्क, वैयक्तिक करार तसेच जाहिरातींच्या माध्यमांतून संघ मालकांना खर्च केलेल्या रकमेच्या दुप्पट नफा होत होता. यंदा मात्र त्यात घट होणार आहे.
यंदाच्या मोसमातील स्पर्धेपूर्वीच्या लिलावात अनेक खेळाडूंवर 5 कोटी रुपयांहून अधिक बोली लावण्यात आली, तर काही खेळाडू अनसोल्डही ठरले आहेत.
खेळाडूंवर कोट्यवधी रुपयांची उड्डाणे होत असताना संघ मालकांना कसा नफा होतो, असे प्रश्न विचारले जाऊ लागले होते. आता त्याची उत्तरेदेखील मिळाली आहेत. आयपीएल स्पर्धेच्या विजेत्या संघाला व उपविजेत्या संघाला अनुक्रमे 20 व 12.5 कोटी रुपये मिळतात. यातील काही टक्के वाटा संघ मालकांकडे जातो. मात्र, विजेतेपदाची रक्कम व संघांनी खर्च केलेली रक्कम पाहता हा एक तोटाच आहे.
तसेच कॉर्पोरेट हाउसेस खेळाडूंच्या लोकप्रियतेला कॅश करत असतात. यातून खेळाडूंना जे करार मिळतात, त्यातील काही टक्के वाटाही संघ मालकांना मिळतो. तसेच मुख्य प्रयोजकत्वातूनही काही रक्कम संघ मालकांना मिळते. दोन वर्षांपूर्वीपर्यंत सामन्याच्या तिकीट विक्रीतूनही काही रक्कम संघ मालकांना मिळत होती. अर्थात यंदा प्रेक्षकांना सामने पाहण्यासाठी मैदानात उपस्थित राहण्याची परवानगी नसल्याने हा लाभ संघ मालकांना मिळणार नसला तरीही ऑनलाइन थेट स्क्रीनिंगमधून काही रक्कम मिळणार आहे.
आयपीएल संघ मालकांना मीडिया प्रसारण हक्कातूनच सर्वात जास्त लाभ होतो. आयपीएलचा टीआरपी प्रचंड आहे, त्यामुळे जगभरातील प्रसारण कंपन्या बीसीआयकडे प्रसारण हक्कासाठी मोठ्या रकमेची बोली लावतात. आतापर्यंत सोनी एंटरटेन्मेंटने 8 हजार 200 कोटीत, तर स्टार इंडिया 16 हजार 347 कोटी रुपयांत प्रसारण हक्क खरेदी केले होते. बीसीसीआयला प्रसारण हक्कांच्या विक्रीतून कोट्यवधी रुपये मिळतात. ही रक्कम बीसीसीआय व संघ मालक वाटून घेतात. यंदाची स्पर्धा गेल्या स्पर्धेपेक्षा जास्त लाभ देणारी ठरेल यात शंका नसली तरीही करोनाचा धोका सुरू होण्यापूर्वी जो प्रचंड लाभ संघांना होत होता तेवढा यंदा होणार नाही.