अरमसाला, (हिमाचल प्रदेश) – ब्रह्मपुत्रेच्या पात्रामध्ये चीनकडून बांधण्यात येत असलेल्या धरणावर तिबेटमधील परागंदा झालेल्या सरकारने आक्षेप नोंदवला आहे. तिबेट सरकारचे अध्यक्ष तेम्पा त्सेरिंग यांनी या धरणाच्या बांधकामावर आक्षेप घेतला आहे. या धरणामुळे नदीच्या पात्रातील भारत आणि बांगलादेशसारख्या देशांमध्ये होणाऱ्या पाणीपुरवठ्यावर विपरीत परिणाम होईल, असे त्यांनी म्हटले आहे.
तिबेटमधून उगम पावणाऱ्या नद्यांवर चीनकडून अनेक धरणे बांधली जात आहेत. मेकोंग नदी भारतात येण्यापूर्वीच तिच्यावर 32 धरणे बांधली जात आहेत. “थ्री जॉर्जेस डॅम’ या धरणाचा आकार एरवीच्या धरणापेक्षा तिपटीने मोठा आहे.
हे धरण जगातील सध्याच्या घडीचे सर्वात मोठे धरण मानले जाते आहे. यारलुंग त्सांग्पो नदीवर चीनकडून जलविद्युत प्रकल्पही उबारला जातो आहे. यामुळे भारत आणि बांगलादेशात येणाऱ्या पाण्यावर निश्चितच परिणाम होईल, असेही त्सेरिंग यांनी म्हटले आहे.
जर या धरणाला काही झाले तर भारतात आसाम आणि बांगलादेशाचे काय होईल? याचा गांभीर्याने विचार करावा लागेल. या नद्यांवर चीनकडून लहान मोठे अनेक जलविद्युत प्रकल्प उभे केले जात आहेत. त्याबद्दलही त्यांनी सावधगिरीचा इशारा दिला आहे. या जलविद्युत प्रकल्पांमुळे पर्यावरण आणि आर्थिक दृष्ट्या मोठे परिणाम संभवतील, असे टोरांटो येथील इंटरनॅशनल फोरम फॉर राईटस ऍन्ड सिक्युरीटीनेही म्हटले आहे.