सातारा – यंदाच्या हंगामात पावसाने आठवडाभराच्या विश्रांतीनंतर सातारा शहर व परिसरात दमदार हजेरी लावली. गुरुवारी दुपारपासून ते रात्री उशिरापर्यंत पाऊस चांगलाच कोसळला. त्यामुळे साहजिकच परिसरातील कण्हेर व उरमोडी धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ झाली. तर दिवसभर पाऊस सुरू राहिला. पावसाचा आनंद लुटण्यासाठी अनेकांनी कास, ठोसेघरची वाट धरल्याचेही दिसून आले.
आठवडाभराच्या विश्रांतीनंतर शुक्रवारी सकाळपासूनच पावसाने जोर धरला. शुक्रवारी साताऱ्याला शोभेल आणि धरणांची पातळी वाढवेल असा पाऊस झाला. दुपारी सव्वा वाजता पावसाचा जोर चांगलाच वाढला. त्यानंतर थोडीशी ऊसंत घेतल्यानंतर पावसाला पुन्हा सुरूवात झाली. त्यानंतर रात्री उशिरापर्यंत पावसाच्या सरी कोसळतच होत्या. दिवसभराच्या पावसामुळे खऱ्या अर्थाने वातावरणात थंडावा निर्माण झाला होता. त्यामुळे सातारकर नागरिकही सुखावले होते.